Testing of new main water pipeline from December 15
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : शहरासाठी टाकण्यात आलेल्या नव्या २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून येत्या डिसेंबरपासून २०० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि कंत्राटदार जीव्हीपीआरने युद्धपातळीवर काम करीत शेवटचा स्लॅब पूर्ण केला आहे. नोव्हेंबरअखेर त्यावर मोटार बसविण्यात येणार असून १५ डिसेंबरपासून या नव्या जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याची चाचणी घेतली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाच्या सूत्रांनी दिली.
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ५६ दललि. क्षमतेच्या योजनेचे पुनरुज्जिवन करून ७५ दललि क्षमतेची योजना केली. या योजनोसाठी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात २६ एमएलडी क्षमतेचे नवे जलशुद्धीकरण केंद्र तयार केले आहे. या केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराला डिसेंबरपर्यंत दोनशे एमएलडी पाणी देण्याची घोषणा केली होती. त्यासोबतच मार्चपर्यंत संपूर्ण योजनेचे काम पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एमजेपी आणि जीव्हीप आरने युद्ध पातळीवर कामाला सुरुवात केली आहे. मागील दोन महिन्यांत जायकवाडी धरणातील जॅकवेलच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी शेवटच्या स्लॅबचे काम नुकतेच संपले आहे. आता स्लॅबवर येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत मोटार बसविण्यात येणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जीव्हीपीआर मुख्य जलवाहिनीतून नक्षत्रवाडीच्या दिशेने पाणीपुरवठ्याची चाचणी घेणार आहे. जलवाहिनीची ही चाचणी येत्या १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन एमजेपीने केले आहे. त्यासाठी सध्या जॅकवेलच्या इतर कामासाठी मनुष्यबळ वाढवून कामाला गती देण्यात आली आहे.
मुख्य जलवाहिनीचे १० गॅप शिल्लक
नक्षत्रवाडी ते जायकवाडीदरम्यान टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहिनीचे १२ गॅप एकमेकांशी जोडणे शिल्लक होते. परंतु, त्यातील दोन गॅप नुकतेच जोडण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या १० गॅप शिल्लक असून त्यातील एक जोडण्यासाठी ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर शटडाऊन घ्यावा लागणार आहे.
२ मोटर बसणार
जॅकवेल २७ खोलीचा असून त्याच्या शेवटच्या स्लॅबवर १५ टन वजनाच्या दोन मोटार बसविण्यात येणार आहेत. या मोटारमुळे जॅकवेलमध्ये बसिवण्यात आलेल्या ३७०० आश्वशक्तीच्या दोन पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जाणार आहे. मोटार बसविल्यानंतरच चाचणीला सुरुवात केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.