छत्रपती संभाजीनगर: शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून पहिल्या टप्प्यात 200 एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक नळाला स्मार्ट मीटर बसविण्यासाठी महापालिकेने शासनाकडे तब्बल 550 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रकल्प शासनाच्या हायबीड ॲन्युटी मेथेड (एचएएम) अंतर्गत राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहरासाठी सुमारे 2740 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नवीन पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. या योजनेचे बहुतांश काम पूर्ण झाले असून येत्या महिनाभरात शहरात 200 एमएलडी पाणी आणले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना दररोज नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. हि नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर शहरात 24 तास पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. मात्र यासाठी पाण्याचे अचूक मोजमाप, गळती रोखणे आणि न्याय्य बिलिंग व्यवस्था आवश्यक असल्याने नळांना स्मार्ट मीटर बसविण्याची योजना आखण्यात आली आहे.
नव्या पाणीपुरवठा योजनेत स्मार्ट मीटरसाठी स्वतंत्र तरतूद नसल्यामुळे महापालिकेने स्वतंत्र प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच्या हायबीड ॲन्युटी मेथेडनुसार या प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी सुमारे 20 टक्के निधी महापालिकेला टप्प्याटप्प्याने खर्च करावा लागणार असून उर्वरित 80 टक्के निधी संबंधित कंत्राटदार एजन्सीकडून उभारला जाणार आहे. यामुळे महापालिकेवरील तातडीचा आर्थिक भार कमी होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम होणार आहे.
पाणीवापरावर नियंत्रण
नळांच्या स्मार्ट मीटरसाठी सुमारे 550 कोटी रुपयांचा सविस्तर प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असून लवकरच त्यावर निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या स्मार्ट मीटर प्रणालीमुळे पाणीवापरावर नियंत्रण येऊन शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठा बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.