सिल्लोड : सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने सिल्लोड तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. अंभई व आमठाणा मंडळांत पुन्हा अतिवृष्टीची नोंद झाली असून केळगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तर सिल्लोड शहरासह १५ गावांची तहान भागविणाऱ्या खेळणा धरणातील पाणीसाठा ३० टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, अजिंठा-अंधारी धरण अद्यापही जोत्याखालीच असल्याने त्या परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा कायम आहेत.
गुरुवारी तालुक्यात सरासरी ११५ मिमी, तर शुक्रवारी ४६ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे पूर्णा व खेळणा नद्यांना पूर आला असून शेतकऱ्यांच्या कोमेजलेल्या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दोन दिवसांच्या पावसामुळे केळगाव धरण भरून वाहू लागले आहे. खेळणा धरणात ३० टक्के,निल्लोड धरणात १० टक्के आणि चारनेर-पेंडगाव धरणात १२ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, अजिंठा-अंधारी धरण अद्यापही जोत्याखालीच असल्याने त्या भागातील पाणीस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही.
पावसाळ्याला दीड महिना उलटल्यानंतरही धरणांमध्ये समाधानकारक साठा नव्हता. मात्र, गेल्या दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे नदी-नाले खळखळून वाहू लागले असून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात मिटला आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरी ४४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.