Sillod A verdict that will determine the direction of the city's politics
सिल्लोड : सिल्लोड नगरपरिषद निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढत न राहता, शहरातील राजकारणाची दिशा ठरवणारा जनतेचा निर्णायक कौल ठरली आहे. या निवडणुकीत शिवसेनेला शहरातील मतदारांचा भरघोस पाठिंबा लाभला, तर भाजपसह इतर विरोधी पक्षांसाठी ही निवडणूक म्हणजे आत्मपरीक्षणाची आणि भविष्यातील अस्तित्वाची कठीण कसोटी ठरली आहे.
विजयामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ही ऊर्जा दिशादर्शक ठरणार आहे. माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांची सिल्लोड शहरावरील मजबूत पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. विधानसभा निवडणुकीत सिल्लोड शहराने दिलेली जवळपास १८ हजार मतांची निर्णायक आघाडी आणि आता नगरपरिषद निवडणुकीतील विक्रमी यश, हे त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा असलेला विश्वास स्पष्ट करतो.
निवडणुकीचा बिगुल वाजताच माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार आणि नॅशनल सहकारी सूत गिरणीचे चेअरमन, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर या पितापुत्रांनी कार्यकत्यांच्या फौजेसह रात्रंदिवस शहर पिंजून काढले. घराघरांत पोहोचत त्यांनी जनतेशी थेट संवाद साधला. त्याचेच फलित म्हणजे अब्दुल समीर यांनी तब्बल २४ हजारांच्या विक्रमी मताधिक्याने नगराध्यक्षपदावर विजय मिळवत भाजपासह सर्व विरोधकांचा सुपडासाफ केला.
या निवडणुकीत अनेक उमेदवारांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही, हेच या लाटेचे बोलके चित्र आहे. ही निवडणूक अनेक राजकीय संकेत देऊन गेली आहे. वेळेची चाहूल ओळखली नाही तर राजकारणात वेळ कुणाची वाट पाहत नाही हे या निकालातून अधोरेखित झाले आहे. हे संकेत कसे आत्मसात करायचे, हा प्रश्न आता प्रत्येक राजकारण्यापुढे उभा आहे. शहरातील शास्त्री कॉलनी आणि टिळकनगर हा भाग भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो.
मागील निवडणुकीत हा किल्ला आमदार अब्दुल सत्तार यांनी सुरेख रणनीतीने भेदला होता; मात्र यंदा भाजपाने हा बालेकिल्ला परत मिळवून आपली काहीशी पत राखली. तरीही सुनील मिरकर यांचा अवघ्या दोन मतांनी झालेला पराभव हा त्यांच्या राजकीय वाटचालीत स्पीड ब्रेकर ठरू शकतो, हेही तितकेच वास्तव आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी वाटपात त्याचे पडसाद उमटतील, अशी चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे स्वपक्षीयांकडूनच त्यांच्या पराभवासाठी काट्याची भूमिका बजावली गेल्याच्या चर्चाना शहरात जोर धरू लागला आहे. या निवडणुकीत उमेदवारी वाटप करताना आमदार अब्दुल सत्तार यांनी नवे-जुने यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला.