छत्रपती संभाजीनगर : उष्णतेच्या लाटेमुळे शहराच्या तापमानात सातत्याने वाढ सुरू आहे. सोमवारी शहराचे तापमान दुसऱ्यांदा ४३.४ अंशाच्या उच्चांकावर गेले असताना मंगळवारी (दि.१२) उष्णतेने हा रेकॉर्डही मोडल्याने संभाजीनगरकर चटक्यांनी अक्षरशः होर-पळले. सकाळपासूनच सूर्य कोपल्याने कमाल तापमानात भंयकर वाढ होऊन पारा ४३.६ अंश सेल्सिअसवर पोहोचला. १० वर्षातील हा सर्वाधिक उष्ण दिवस ठरला. दिवसभर उन्हाचे असह्य चटके आणि उष्ण झळांमुळे अंगाची लाहीलाही सुरू होती.
यंदा एप्रिल महिन्याच्या शहराच्या सुरुवातीपासूनच तापमानाने चढता क्रम धरला आहे. सूर्य देवता चांगलेच तळपू लागल्याने शहराचे तापमान सलग काही दिवसांपासून ४० अंश सेल्सिअसच्या वर आहे उन्हाच्या तडाख्यामुळे सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याने अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे.
सोमवारीही उष्णतेच्या लाटेमुळे २६ एप्रिलनंतर कमाल तापमान दुसऱ्यांदा ४३. ४ अंशावर पोहचले होते. तर मंगळवारचा दिवस याहूनही अधिक दाहक ठरला. सकाळपासून ऊन चांगलेच चटकले होते.
सायंकाळी चिकलठाणा वेधशाळेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, कमाल ४३. ६ तर किमान २७. ८ अंश सेल्सियसची नोंद झाली आहे. दिवसभर उन्हाच्या असह्य झळा आणि चटक्यांनी शहरवासीयांना हैराण केले. त्यामुळे थंडावा मिळवण्यासाठी रसवंतीगृह, शीतपेय, लिंबूपाणी, ताक, पाळांचे रस घेताना गर्दीचे चित्र होते. तसेच डोक्यावर टोपी, रुमाल, छत्री यांचा वापर करून नागरिकांनी उन्हापासून बचाव केला.
विजेसह वादळी पावसाची शक्यता
मराठवाड्यात उष्णतेचा कहर सुरू असतानाच वादळी पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. काही जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणून यलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरसह उर्वरित मराठवाड्यात अंशतः उन्हाचा चटका, अंशतः ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांसह हवामान विभागाने वर्तवली आहे.
काळजी घेण्याचा सल्ला
वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर न पडण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा आणि हलका आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. आगामी काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.