छत्रपती संभाजीनगर: मालमत्ता सर्वेक्षण आणि कर आकारणीच्या प्रस्तावावर महापालिकेने मालमत्ता करामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ न करता मालमतांचे सर्वेक्षण करून कर आकारणी करावी. त्यासोबतच एजन्सी नियुक्त करताना याअगोदरचे अनुभव लक्षात ठेवत स्पेकची पुनर्रावृत्ती नको, अशा सूचना सर्व पक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी (दि. १४) सर्वसाधारण समेत केल्या. त्यावर महापालिका कुठल्याही प्रकारची करवाढ करणार नसून, केवळ नव्या-जुन्या बांधकामांचे सर्वेक्षण करून कर आकारणी करणे, एवढेच काम होणार आहे, अशी ग्वाही महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सर्वसाधारण सभेपुढे दिली.
महापालिकेची मंगळवारी पार पडलेली सर्वसाधारण सभा तब्बल आठ तास चालली. यात मालमत्तांचे सर्वेक्षण आणि फेरमूल्यांकन या प्रस्तावासोबत ड्रोणद्वारे सर्वेक्षण आणि पीआर कार्ड वाटप, गुंठेवारी, रस्त्यांवरील खड्डे आणि इतर विविध प्रस्तावांचा समावेश होता. यात सर्वाधिक पाच तास मालमत्ता सर्वेक्षण आणि फेरमूल्यांकनाच्या विषयावर काथ्याकूट झाला. सभेत उपस्थित असलेल्यापैकी सुमारे ३२ हून अधिक सदस्यांनी या प्रस्तावावर आले मत मांडले.
प्रशासनाने जो प्रस्ताव मांडला, त्यात मालमत्ता करामध्ये कुठल्याही प्रकारे वाढ होणार नाही, एवढीच हमी द्यावी, नव्याने सर्वेक्षण करून प्रत्येक घराला कर आकारणी होणे आवश्यक असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. या प्रस्तावावर सर्वप्रथम भाजप नगरसेवक राजू वैद्य यांनी मत मांडले, ते म्हणाले की, किती मालमत्तांचे सर्वेक्षण झाले, याची माहिती प्रशासनाकडे नाही. यापूर्वी 'स्पेक' या एजन्सीने मालमत्तांचे सर्वेक्षण केले, त्याबद्दल अनेक तक्रारी होत्या.
महापालिकेने या एजन्सीवर १ कोटी ५० लाख रुपये खर्च केले. स्पेकनंतर जीआयएस मॅपिंगसाठी २० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, यातून एक लाख ७२ हजार मालमत्ता शोधण्यात आल्या. ते वीस कोटी रुपयेही पाण्यात गेले. श्री मित्र अॅपसाठी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले, मात्र महापालिकेच्या उत्पन्नात एवढे करूनही वाढ झाली नाही. त्यामुळे महापालिकेचीच यंत्रणा वापरून मालमत्तांचे सर्वेक्षण आणि फेरमूल्यांकन करण्याची सूचना केली, तर वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अफसर खान व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक सचिन खैरे यांनी विरोध केला, भाजपचे राजगौरव वानखेडे यांनी मालमत्ता कर वसुलीबाबत विविध मुद्दे मांडून सर्वेक्षण केल्यानंतर करवाढ होणार का? असा प्रश्न उपस्थित केला.
यासोबतच विरोधी पक्षनेता समीर साजेद बिल्डरसह भाजपचे नगरसेवक बालाजी मुंडे, महेश माळवतकर, माधुरी अदवंत, अशोक दामले, शिल्पाराणी वाडकर, अर्चना निळकंठ, विश्वनाथ स्वामी, रामेश्वर भआदवे, मनोज गांगवे, एमआयएमचे ओसामा अब्दुल कदीर, राष्ट्रवादीचे नवीनसिंग ओबेरॉय, उबाठाचे रशीद मामू, गणेश लोखंडे यांनीही सूचना केल्या.
नागरिकांना त्रास नको
या सर्वेक्षणाचे व फेरमूल्यांकनाचे काम महापालिकेच्या माध्यमातूनच व्हावे, अशी भूमिका त्यांनी मांडली, शिवसेनेचे त्रिबक तुपे म्हणाले, स्पेक एजन्सीचा अनुभव वाईट असल्याचे सांगितले. तर माजी महापौर अनिता घोडेले यांनीही स्पेकचा मुद्दा पुढे करीत पूर्वीचा वाईट अनुभव असतानाही नवी एजन्सी नियुक्त करताय, चांगली बाब आहे, परंतु नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याची मागणी केली.