Sambhajinagar Murder Case Six accused arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील चितेगाव येथील एका खुनाच्या गुन्ह्यात शेख अकबर महबूब मियाभाई शेख यांना न्यायालयाने निर्दोष सोडल्यानेच सहा जणांनी त्यांचे अपहरण करून निघृण हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांचा मृतदेह दादेगाव (ता. पैठण) शिवारात मंगळवारी (दि.१) आढळून आला होता. त्यानंतर बिडकीन पोलिसांनी बुधवारी सहा आरोपींना अटक केली.
वाहिद याकूब शेख (४०), लतीफ याकूब शेख (४५), मोबीन मुनाफ सय्यद (२८, तिघे रा. चितेगाव), फजल उर्फ शाहरुख सरदार शेख (२८, रा. कायगाव ता. गंगापूर), सोनाजी ताराचंद भुजबळ (३०, रा. दहिफळ, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) आणि इकबाल अहमद जमादार (५०, रा. एमआयडीसी पैठण) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती बिडकीन ठाण्याचे प्रभारी निलेश शेळके यांनी दिली.
अधिक माहिती अशी की, शेख अकबर ऊर्फ मियाभाई महेबूब शेख (५०) कारने (एमएच-२०-बीएन ४४८८) पंढरपूर येथे गेले होते. परंतु त्यांच्याशी घरच्यांनी संपर्क केला असता फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाने बिडकीन पोलिस ठाण्यात ३० जून रोजी तक्रार दाखल केली होती. शेख यांचे दोन मोबाईल ढोरकीन गावाच्या परिसरात आढळून आले. मंगळवारी (दि.१) दादेगाव (ता. पैठण) परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पैठण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी कार घटनास्थळी आढळून आली नव्हती. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्याची उकल केली. आरोपी वाहिद याकूब शेख याचा भाऊ रउफ याकूब शेख याच्या खुनाच्या गुन्ह्यात शेख अकबर उर्फ मियाभाई व काका, भाऊ यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. तेव्हापासून वाहिद अकबर यांना त्यांना मारण्यासाठी मोक्याची वाट पाहत होता. त्याने अन्य पाच साथीदारांना अपहरण करण्यासाठी मदतीला घेतले.
सोमवारी (दि.३०) दुपारी साडेबारा ते मंगळवारी (दि.१) या दरम्यान चितेगाव, गेवराई तांडा स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रोडवर व दादेगाव याभागात मियाभाई यांचे सहा जणांनी अपहरण करून घेऊन गेले. त्यानंतर त्यांची क्रूरपणे हत्या केली, असे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात फिर्यादी साहिल अकबर शेख (२१, रा. चितेगाव) यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.