sambhajinagar muncipal election news
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीत एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चांगलाच गोंधळ उडाल्याचे दिसून आले. मी तीन अर्ज भरले, एकाला एबी फॉर्म जोडलाय. त्यामुळे एक मागे घेऊ का, असा सवाल गोंधळलेल्या उमेदवारांनी उपस्थित करताच निवडणूक निर्णय अधिकारी चक्रावले. आहो तसे केल्यास तुम्ही निवडणूक रिंगणातून बाहेर व्हाल, असे सांगत त्यांनी उमेदवाराची चांगलीच खिल्ली उडवली.
महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.२) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान उमेदारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या बंडखोर उमेदवारांना रिंगणातून बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले.
याच गडबडीत काही राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवारही निवडणूक कार्यालयांमध्ये दाखल झाल्याचे दिसून आले. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर हळूच प्रश्न उपस्थित करीत म्हणाले, साहेब मी पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसोबतच इतर तीन डमी उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत.
त्यामुळे आता यातील अधिकृत एबी फॉर्म जोडलेला उमेदवारी अर्ज ठेवून उर्वरित तीन डमी अर्ज मागे घेऊ का? असा काय प्रश्न उमेदवार विचारतो, असा विचार करीत निवडणूक निर्णय अधिकारी पहिले चक्रावून गेले. मात्र नंतर त्यांना कळाले की, याबाबत उमेदवाराला काहीच माहिती नाही. त्यामुळे साहेब तसे केल्यास तुमचा उमेदवारी अर्जच मागे घेतला जाईल. त्यामुळे जे डमी अर्ज असतात. ते अपोआप अधिकृत उमेदवारीसोबत मर्च होतात, असे सांगत त्यांनी हसू आवरले.
आता नेत्यांनाच प्रशिक्षणाची गरज
निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते माघारी घेणे आणि निवडणुकीचा खर्च, त्यासोबतच इतर सर्व प्रक्रियेबाबतची अचूक माहिती प्रत्येक उमेदवाराला असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांनी आता असे प्रशिक्षण वर्ग घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे.