छत्रपती संभाजीनगर : शहरात नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या पाणीपुरवठा टँकरांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) धडक कारवाई केल्याने मागील तीन दिवस शहरातील नो नेटवर्क भागांमध्ये पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर आरटीओ, महानगरपालिका आणि टँकरचालक यांच्यात झालेल्या चर्चेनंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेमार्फत शहरातील पाणीपुरवठा नसलेल्या भागांना ८४ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी मनपाने राम इन्फ्रास्ट्रक्चर आणि शेख कन्स्ट्रक्शन या दोन खासगी एजन्सींना कंत्राट दिले आहे.
या एजन्सींना वर्षाकाठी पाच कोटी रुपयांहून अधिक मानधन अदा केले जाते. मात्र अलीकडे या टँकरच्या कामकाजात अनेक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले होते. यात टँकरवर जीपीएस यंत्रणा नसणे, फेऱ्यांचे कोणतेही नियोजन न करणे, तसेच काही चालकांकडून पाणी विक्री केल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर आरटीओने अनधिकृत टँकरांवर कारवाई करत कागदपत्रांची तपासणी मोहीम राबवली. कारवाईच्या भीतीने मनपाचे तसेच खासगी टँकरचालकांनी टँकर घरीच उभे केल्याने शहरातील अनेक भागांत पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागली.
दरम्यान, परिस्थिती गंभीर होताच प्रशासनाने तातडीने बैठक बोलावून तोडगा काढला. यामध्ये चालकांचे वैध परवाने, वाहनांची पीयूसी, विमा आदी कागदपत्रे पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. संबंधित अटींची पूर्तता झाल्यानंतर टँकर सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.