Refusal to quash case against MLA Owaisi
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. जोशी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने गुन्हा आणि त्या अनुषंगाने कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेली कार्यवाही रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे अर्धापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातील खटल्याची प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे. या गुन्ह्याची न्यायालयीन प्रक्रिया अर्धापूरच्या जेएमएफसी न्यायालयात सुरू आहे.
डिसेंबर २०११ मध्ये नांदेड येथे झालेल्या एका सभेत ओवैसी यांनी केलेल्या भाषणावरून २०१३ मध्ये अर्धापूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम २९५-अ आणि २९८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या आधारे कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेली फौजदारी कार्यवाही रद्द करण्यासाठी ओवैसी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
ओवैसी यांच्या वतीने याचिकेत, न्यायालयाने गुन्ह्याची दखल घेण्यास झालेल्या विलंबाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ४६८ नुसार प्रकरणाची दखल घेण्याची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने कार्यवाही सुरू केल्याने हा खटला मुदतीबाहेरचा असल्याचा दावा करण्यात आला.
तसेच संबंधित भाषणामागे धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचेही याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रश्मी गौर यांनी याचिकेला विरोध केला. कलम ४६८ नुसार मुदतीची गणना न्यायालयाने समन्स बजावल्याच्या तारखेपासून नव्हे, तर गुन्हा अथवा तक्रार दाखल झाल्याच्या तारखेपासून केली जाते, असा युक्तिवाद केला.