

Elgar in Sambhajinagar against reservation sub-categorization
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आरक्षणामुळे आज अनेक विभागांत अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती उच्च पदावर विराजमान होत आहेत. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, हीच प्रगती मनुवादी विचारसरणीला खूपत आहे. त्यामुळे ही प्रगती थोपवण्यासाठीच सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाचा घाट घातला असल्याचा घाणाघात रिपब्लकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी (दि.१२) उपवर्गीकरणाविरुद्ध काढलेल्या मोर्चाला संबोधित करताना केला.
अनुसूचित जातीतील विविध सामाजिक संघटना आणि भीमसैनिकांनी उपवर्गीकरणाच्या विरोधात क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत बुधवारी मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिक सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केले. सकाळी १ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी ३.३० च्या सुमारास मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
या सभेला आनंदराज आंबेडकरांनी संबोधित करताना उपवर्गीकरणाचा घाट आरएसएसच्या कुटील डावाचा एक भाग आहे. त्यांनी आतापर्यंत हिंदू-मुस्लीम, मराठा-ओबीसी अशी भांडणे लावली. आता बौद्ध आणि मातंग समाजात भांडणे लावून फूट पाडण्याचा डाव आहे. हा डाव कदापि सफल होऊ देणार नसून, उपवर्गीकरण होऊ देणार नाही, असे ठणकावून सांगितले. सभा संपल्यानंतर आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपवर्गीकरण रद्द करा यासह इतर विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडे सोपवले.
यावेळेसही आंबेडकरांनी लक्ष वेधले
मोर्चादरम्यान मोर्चेकऱ्यांच्या हाती निळा झेंडा आणि हातात विविध घोषणांचे फलक होते. यात त्या वेळेसही आंबेडकर, या वेळेसही आंबेडकर, या फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचबरोबर उपवर्गीकरण होऊ देणार नाही, बदर समिती बरखास्त करा यासह इतर फलकांच्या माध्यमांतून उपवर्गीकरणाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात गावपातळी ते जिल्हापातळीवर आंदोलने सुरू आहेत. सरकारने उपवर्गीरण रद्द करण्याचा निर्णय न घेतल्यास हे आंदोलन तीव्र करून डिसेंबरमध्ये विधानसभेत घेराव घालण्याचा इशारा दिला. तसेच समाजकल्याण विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात येत आहे. तरीही मंत्री गप्प असल्याने सामाजिक न्याय मंत्र्यांना येथून हाकलावे, अशीही मागणी यावेळी केली. या मोर्चात महिला, पुरुष, विद्यार्थी, वकिलांसह इतरांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
खासदार, आमदारांना जागा दाखवू बाबासाहेबांच्या नावावर निवडून आलेले खासदार, आमदार मोर्चाकडे फिरकले नाहीत. २०२९ मध्ये त्यांना त्यांची जागा दखवून देण्यासाठी समाजाने एकजूट राहणे आवश्यक आहे. केवळ मोर्चासाठी एकजूट न राहता ही एकजूट अशीच ठेवावी, असे आवाहन ॲड. अमन आंबेडकर यांनी केले