पिशोर: रासायनिक खतांच्या सतत वाढणाऱ्या किमती, जमिनीची घटती सुपीकता आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम या पार्श्वभूमीवर शेतकरीवर्ग पुन्हा पारंपरिक आणि नैसर्गिक शेती पद्धतीकडे वळताना दिसत आहे. याच बदलत्या प्रवाहामुळे शेणखताला अभूतपूर्व मागणी निर्माण झाली असून, सध्या बाजारात शेणखताला तब्बल 2800 ते 3000 रुपये प्रतिट्रॉली असा दर मिळत आहे. त्यामुळे ग््राामीण भागात शेणखताला अक्षरशः सोन्याचा भाव आल्याची चर्चा रंगत आहे.
गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खालावला. तसेच उत्पादनात घट झाली आणि पिकांच्या गुणवत्तेवरही विपरित परिणाम झाला. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले. या अनुभवातून धडा घेत शेतकरी आता सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारत आहेत. विशेषतः येऊ घातलेल्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मोठ्या प्रमाणात शेणखत साठवण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, शेणखत भरण्यासाठी मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने शेणखत ट्रॅक्टरमध्ये भरला जात आहे. एक ट्रॅक्टर भरण्यासाठी सुमारे 300 रुपये आणि वाहतुकीसाठी आणखी 300 रुपये असा खर्च येत आहे. म्हणजेच एका ट्रॉली शेणखतासाठी शेतकऱ्याला एकूण सुमारे 3600 रुपये खर्च करावा लागत आहे.
याशिवाय, शेतात खत पसरवण्यासाठीही सुमारे 300 रुपये मजुरी द्यावी लागत आहे. त्यामुळे शेणखताचा एकूण खर्च शेतकऱ्यांसाठी लक्षणीय वाढलेला आहे.ग््राामीण भागात गायी-म्हशींची संख्या कमी होत चालल्यामुळे शेणखताचे उत्पादन मर्यादित झाले आहे. परिणामी, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असून, दरात मोठी वाढ झाली आहे. अनेक शेतकरी गावोगावी जाऊन शेणखत खरेदी करताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर शेणखतासाठी आगाऊ नोंदणी (बुकिंग) सुरू असून, पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य या तत्त्वावर वितरण केले जात आहे.
मागणी वाढल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
वाढत्या मागणीमुळे शेणखताच्या गुणवत्तेवरही प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी अपूर्ण कुजलेले किंवा निकृष्ट दर्जाचे शेणखत विक्रीस येत असल्याच्या तक्रारी आहेत.
पशुपालकांना फायदा
शेणखताच्या वाढत्या दराचा पशुपालकांनाही मोठा फायदा होत आहे. शेणखत हे आता दुय्यम नव्हे, तर महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन बनले आहे. अनेक शेतकरी आणि पशुपालक शेणखत विक्रीतून चांगले उत्पन्न मिळवत असून, ग््राामीण अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळत आहे.तज्ज्ञांच्या मते, शेणखतामुळे जमिनीची सुपीकता वाढते, मातीचा पोत सुधारतो, पाण्याचा धरून ठेवण्याचा गुणधर्म वाढतो आणि उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होते. यामुळे पिकांची वाढ चांगली होऊन दीर्घकालीन उत्पादनक्षमतेत वाढ होते. हे खत आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.