'One Village, One Ganpati' in 48 villages of Paithan Taluka
दादासाहेब गलांडे
पैठण : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा पैठण तालुक्यात सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. उत्सवाचा खर्च कमी करून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेक मंडळांचा कल दिसून येत आहे. तालुक्यातील पाचोड, पैठण, एमआयडीसी पैठण आणि बिडकीन या चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ४६६ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. तर ४८ गावांत 'एक गाव, एक गणपती' या संकल्पनेतून उत्सव साजरा केला जात आहे.
पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२० गणेश मंडळे असून, १४ गावांत 'एक गाव, एक गणपती' उपक्रम राबविण्यात येत आहे. पैठण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११६ मंडळे असून, सहा गावांत ही संकल्पना आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १०२ मंडळे असून, सात गावांत 'एक गाव, एक गणपती' आहे. बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक १२८ मंडळे असून, २१ गावांत एक गाव एक गणपती साकारण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध भागांत पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला आहे. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. पैठणचे पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, पाचोडचे सहायक पोलिस निरीक्षक पंडित, एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे आणि बिडकीनचे पोलिस अधिकारी शेळके परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी गणेश मंडळांच्या बैठका घेऊन प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजकंटकांकडून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कारवाई
सुनील पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, पैठण : गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि सामाजिक सलोख्याचा उत्सव आहे. सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर तसेच समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
अफवांवर विश्वास ठेवू नका
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १०२ गणेश मंडळे असून, सात गावांत 'एक गाव, एक गणपती' उपक्रम आहे. बालानगरसारख्या मोठ्या गावातही ही संकल्पना राबविण्यात येत आहे. पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढण्यासाठी बैठका घेण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावरून अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे यांनी केले.