कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके. Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Abhijit Deepke : सरकारला अजून किती प्रथमेशसारखे बळी हवेत? MPSC करणाऱ्या तरुणांना CJP संस्थापक दीपकेंनी कोणते आवाहन केले?

प्रथमेश देशमुखला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्याला मागे सरकायचं नाही

पुढारी वृत्तसेवा

Abhijit Deepke on Prathamesh Deshmukh : "प्रथमेश देशमुख हा तरुण धाराशिवमधून मोठे स्वप्न घेऊन पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) तयारी करण्यासाठी पुण्यात गेला होता. त्याला वाटलं असेल तो मोठा अधिकारी होईल. राज्याची सेवा करेल. ज्या सरकारमध्ये काम करणे हे प्रथमेशचे स्वप्न होतं, त्या सरकारच्या गैरकारभारामुळे प्रथमेशला जीव द्यावा लागला. त्याने जीवन का संपवले, याचा सरकारने विचार केला पाहिजे. अजून किती प्रथमेशचे जीव गेल्यानंतर सरकारला जाग येईल," असा संतप्त सवाल करत "माझी एमपीएससीच्या सगळ्या मुलांना हात जोडून विनंती आहे तुम्ही असलं कुठलंही पाऊल उचलू नका. तुम्ही तुमच्या घरच्यांचा विचार करा तुम्ही स्वतःचा विचार करा, तुमचा जीव जास्त महत्त्वाचा आहे सरकारसाठी नसला तरी तुमच्या घरच्यांसाठी महत्त्वाचा आहे," अशा शब्दांमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या तरुणांना भावनिक साद घातली.

प्रथमेशने टोकाचे पाऊल का उचलले याचा सरकारने विचार केला पाहिजे

माध्यमांशी बोलताना दीपके म्हणाले की, प्रथमेश देशमुख हा तरुण पुण्यात आला तेव्हा त्याला वाटलं असेल तो मोठा अधिकारी होईल. राज्याची सेवा करेल, देशाची सेवा करेल; पण झालं काय. ज्या सरकारमध्ये काम करणे हे प्रथमेशचे स्वप्न होतं, त्या सरकारच्या गैरकारभारामुळे प्रथमेशला जीव द्यावा लागला.

पेपरफुटीचा विद्यार्थ्यावर काय परिणाम होतो याची सरकारला कल्पना आहे का?

आता काही जण म्हणतील की, एमपीएससी करणाऱ्या एका तरुणाने जीवन संपवले त्यात सरकारचा काय दोष आहे, जेव्हा कुठल्या परीक्षेत गडबड होते, कुठल्या परीक्षेचा निकाल व्यवस्थित वेळेत लागत नाही. जेव्हा पेपर फुटतो किंवा तारीख पुढे ढकलली जाते त्याचा विद्यार्थ्यावर काय परिणाम होतो याची सरकारला कल्पना आहे का?, असा सवालही दीपके यांनी सरकारला केला.

तरुणांवर प्रचंड आर्थिक दडपण

प्रथमेशसारखा मुलगा जेव्हा गावातून येतो तेव्हा त्याच्याकडे जास्त पैसे नसतात. अशी मुलं पुण्यात एका छोट्या खोलीत राहतात. मेसवर एका वेळी जेवतात. जेव्हा पेपर फुटतो, तारीख पुढे ढकलली जाते तेव्हा प्रथमेशसारख्या गावातून येणाऱ्या मुलावर किती प्रेशर पडत असेल. परीक्षेची तारीख पुढे गेली की, घरभाडे द्यावे लागणार, अजून मेसचा खर्च उचलावा लागेल त्याच्यावर आर्थिक दडपण किती असू शकतं आणि त्या आर्थिक दडपणात कसं जगावं. अशा प्रकारामुळे मुलांवर प्रेशर येतं आणि त्यामुळे मुलं असं पाऊल उचलत आहेत, असेही दीपके यांनी सांगितले.

अजून किती प्रथमेशचे जीव गेल्यानंतर सरकारला जाग येणार?

अजून किती प्रथमेशचे जीव गेल्यानंतर सरकारला जाग येईल, असा सवाल करत माझी एमपीएससीच्या सगळ्या मुलांना हात जोडून विनंती आहे तुम्ही असलं कुठलंही पाऊल उचलू नका. तुम्ही तुमच्या घरच्यांचा विचार करा तुम्ही स्वतःचा विचार करा, तुमचा जीव जास्त महत्त्वाचा आहे सरकारसाठी नसला तरी तुमच्या घरच्यांसाठी महत्त्वाचा आहे. जेवढे मुले आंदोलन करतात त्या सगळ्यांना माझी विनंती आहे तुम्ही सगळे संघटित राहा, एकमेकांची हिम्मत वाढवा आपल्याला लढायचं आहे आपण लढू. प्रथमेशला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. प्रथमेशला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्याला मागे सरकायचं नाही, असा निर्धारही दीपके यांनी यावेळी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT