Mangir Baba Yatra: Petition in bench to stop Aghori practice np88
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शेंद्रा येथील मांगीरबाबाच्या यात्रेत देवाच्या साक्षीने पाठीत लोखंडी गळ टोचून नवस फेडण्याची अघोरी परंपरा अनेक शतकांपासून सुरू होती. ही परंपरा अघोरी असून, विज्ञानाच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे यात्रेतील गळ टो-चणीची अघोरी प्रथा बंद करावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती.
ही याचिका गणपत भिसे यांनी लाल सेना संघटनेच्या वतीने अॅड. अंगद कानडे यांच्यामार्फत दाखल केलेली आहे. सुनावणीत न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. हितेश वेणेगावकर यांनी याचिकाकर्ते गणपत भिसे यांना शपथपत्र दाखल करण्याची सूचना केली होती. न्यायालयाचे म्हणणे होते की, याचिकाकर्त्यांनीही गळबंदीच्या उपक्रमात सहभागी होणे अपेक्षित होते.
केवळ शासन-प्रशासनावर जबाबदारी ढकलून चालणार नाही त्यामुळे याचिकाकर्त्यांनी यापूर्वी गळबंदीसाठी काय-काय प्रयत्न केलेले आहेत, या संदर्भात न्यायालयात माहिती सादर करावी, तपशील सादर करावी, असे आदेशित केले होते. यावर याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. अंगद कानडे यांनी आज, मागील दहा-बारा वर्षांपासून लाल सेनेच्या वतीने गळबंदी करण्यासंदर्भात केलेली जाणीव जागृती, शासन प्रशासनाकडे केलेला पाठपुरावा आदी संदर्भात कागदपत्रे सादर केली. न्यायालयाने सर्व कागदपत्रे दाखल करून घेत पुढील सुनावणी १८ एप्रिल रोजी ठेवली आहे.
यापूर्वी सदरील याचिकेवर २०१९ मध्ये तत्कालीन न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. नितीन सांबरे यांनी ही अघोरी प्रथा कायद्याने बंद करण्यात आल्याचा निवाडा दिला होता, परंतु अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा कोण असेल किंवा कशी असावी, यासंदर्भात निर्णय झालेला नव्हता. दरम्यान, येत्या ७ एप्रिलपासून शेंद्रा येथे मांगीरबाबांचा यात्रा महोत्सव सुरू होत आहे.
या महोत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांनी स्वतःच्या शरीराला इजा होईल, असे कुठलेही प्रयत्न करू नयेत आणि गळटोचणीस कायद्याने बंदी घालणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करावे, असे आवाहन याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. अंगद कानडे आणि याचिकाकर्ते गणपत भिसे यांनी केले आहे.