छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात एक धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक घटना समोर आली आहे. समाजकार्य महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाने थेट औरंगाबाद खंडपीठ गाठत एका वकिलाला, “मी ६० हजार रुपयांत १४ वर्षांची मुलगी विकत घेतली आहे, तिच्याशी लग्न करू का?” असा धक्कादायक सवाल केला. या प्रश्नामुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली.
खंडपीठातील ॲड. महेश भोसले यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत त्या तरुणाला विश्वासात घेतले आणि तत्काळ मुख्य सरकारी वकील अमरजित गिरासे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.
दरम्यान, वकिलांनी त्या तरुणाला शपथपत्रासाठी संबंधित मुलीला घेऊन येण्यास सांगितले. दुसरीकडे पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे काही तासांतच त्याच्या घरापर्यंत धाव घेत चौकशी सुरू केली. या तपासात समोर आलेले सत्य अधिक धक्कादायक होते. संबंधित तरुणाने कोणतीही मुलगी विकत घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाले.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तरुणाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे त्याचे लग्न जमत नव्हते. “मुलगी विकत मिळते” अशी माहिती कुणीतरी दिल्यानंतर अशी मुलगी विकत घेतल्यास कायदेशीर अडचण येईल का, हे जाणून घेण्यासाठी तो थेट खंडपीठात पोहोचला होता. या घटनेमुळे समाजात वाढत चाललेली दिशाभूल, विवाहासाठी होणारी फसवणूक आणि मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी नागरिकांनी अशा अफवा किंवा बेकायदेशीर गोष्टींना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.