

Life-Threatening Knife Attack on Externed Accused in Vadgaon Kolhati
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : भरदिवसा एका हद्दपार आरोपीवर चाकूने सपासप वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.३०) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वडगाव कोल्हाटी येथे घडली. या हल्ल्यात करण मारुती गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय राजू दहातोंडे, ओंकार ऊर्फ सोन्या जिभुवन, अभिजीत फाटे आणि किरण घुमरे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी करण गायकवाड याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र मेहुणीच्या लग्नासाठी पैशाची आवश्यकता असल्याने तो जालन्याहून घरी वडगाव येथे आला होता. गुरुवारी दुपारी तो वडगाव येथील लक्ष्मीमाता मंदिराजवळील मोकळ्या मैदानात डुकराला खाद्य टाकण्यासाठी गेला होता.
यावेळी तिथे आलेल्या चौघा आरोपींनी करणला गाठले. तू आमच्याशी पंगा घेतो का? तुला आता मारूनच टाकतो, असे म्हणत अजय दहातोंडे व अभिजीत फाटे यांनी त्यांच्या हातातील धारदार चाकूने करणच्या पाठीवर सपासप वार केले. तसेच त्याच्या हातातही चाकू खुपसला. तर ओंकार आणि किरण यांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
रक्तबंबाळ अवस्थेत पळत आला घरी हल्ल्यानंतर रक्तबंबाळ झालेला करण आरडाओरड करत घरी पळत आला आणि दारातच जखमी अवस्थेत कोसळला. नातेवाइकांनी त्याला तातडीने दुचाकीवरून घाटी रुग्णालयात दाखल केले. तो सध्या बेशुद्धावस्थेत असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आदल्या दिवशीही (दि.२९ एप्रिल) आरोपी अजय व त्याच्या एका मित्राने करणला याच ठिकाणी चाकूचा धाक दाखवला होता.
या प्रकरणी करणची बहीण रोशनी अमोल जाधव (रा. क्रांती चौक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीविरुद्ध एमआयडीसी वाळूज ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल
वडगावात गुन्हेगारी वाढली
वडगावातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन तत्कालीन पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी पोलिस दत्तक गाव योजनेतून वडगाव दत्तक घेतले आहे. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक किशोर नवले यांनी पोलिस आयुक्तालयाच्या मदतीने गावात जनहिताच्या तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवून वडगावातील गुन्हेगारी जवळपास संपुष्टात आणली होती. मात्र दरम्यानच्या काळात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी गाव दत्तक योजनेकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही. आता तर ही योजनाच बंद पडली आहे. पोलिसांचा धाक राहिला नसल्याने वडगावत लुटमार, हाणामाऱ्या, चोऱ्या आदी घटना वाढल्या आहेत. अवैध दारू विक्री आदी अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. यातून भाईगिरी वाढल्याने वडगावात पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. स्थानिक पोलिसांचे लक्ष नसल्याने गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत अधिकच वाढ झाली आहे.