Maharashtra Weather Update
पैठण : हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, जोरदार वारे, वादळ आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी सोमवारी (दि. ३०) संबंधित यंत्रणा आणि नागरिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या. संभाव्य पावसामुळे नदीपात्रातील पाणीपातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, पैठण तालुक्यात सकाळपासून उष्णतेचा तडाखा जाणवत होता. मात्र दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ स्थिती निर्माण झाली. सायंकाळी सहाच्या सुमारास विहामांडवा, बिडकीन, लोहगाव, पाचोड, दावरवाडी, ढोरकीन, नवगाव, जायकवाडी, पिंपळवाडी, आडुळ, बालानगर, आपेगाव, वडवळी, तुळजापूर, हिरडपुरी आणि पाटेगाव परिसरात जोरदार पाऊस झाला.
या अचानक झालेल्या पावसामुळे शेतकरी आणि वीटभट्टी व्यावसायिकांची धावपळ उडाली. सध्या गहू काढणीचे काम सुरू असल्याने काढून ठेवलेला गहू भिजून नुकसान झाल्याची स्थिती अनेक ठिकाणी दिसून आली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत अतिवृष्टी व गारपीटीची शक्यता असल्याने जायकवाडी धरण प्रकल्प प्रशासनालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.