नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात रविवारी (दि. २९) हवामान अचानक बदलले व मालेगाव, चांदवड, सिन्नर आणि येवला या चार तालुक्यांना अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने झोडपून काढले. या अस्मानी संकटामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर रविवारी दुपारच्या सुमारास आकाशात काळे ढग जमा झाले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी पावसाचा जोर इतका होता की, अवघ्या अर्ध्या तासात रस्ते जलमय झाले.
मालेगाव व चांदवड तालुक्यांमधील काही गावांमध्ये बोराच्या आकाराच्या गारा पडल्या. यामुळे द्राक्षबागा आणि कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. सिन्नरच्या पूर्व भागात आणि येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने उभ्या पिकांचे नुकसान केले.
गारांमुळे गहू आणि हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे आगामी हंगामाचे उत्पादन आणि दर्जावर मोठा परिणाम होणार आहे.
येवल्यात उभी पिके भुईसपाट
येवला : तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात सायंकाळी वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतात काढून ठवलेला कांदा, हरभरा, गहू पिकांचे मोठे नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांचा काढणीस आलेला गहू भुईसपाट झाला आहे. रावते वस्ती, न्याहारखेडे येथे गारा पडल्या. तर कोळगाव परिसरात धनवटे वस्तीवर घरासमोरील झाड उन्मळून पडले.