'Lotus Square' instead of the 'Farmer's Statue' at Kartiki Chowk?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा बळीराजाच्या कष्टाची साक्ष देणारा कार्तिकी चौकातील शेतकरी पुतळा हटवून त्याच ठिकाणी कमळ चौक उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. नगरपालिका काळात सिद्धार्थ उद्यानालगत उभारण्यात आलेल्या या पुतळ्याच्या जागेवर चौकाचे नव्याने सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव गेल्या महिनाभरापासून प्रशासकीय प्रक्रियेत आहे.
सध्या ही फाईल महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रशासन पुतळा कायम ठेवते की त्याच्या जागेवर नवे चौक विकसित करण्यास हिरवा कंदील देते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
कार्तिकी चौकातील शेतकरी पुतळा हा अनेक वर्षापासून शहराच्या सार्वजनिक अवकाशाचा भाग आहे. हातात ज्वारीचे कणीस घेतलेली शेतकऱ्याची प्रतिमा ही अन्नदात्याच्या श्रमाचे प्रतीक म्हणून पाहिली जाते. शहरात नगरपालिका अस्तित्वात असतानाच हे शिल्प उभारण्यात आले होते.
त्यामुळे केवळ सौंदर्याकरणाच्या नावाखाली त्याचे स्थलांतर किंवा विलोपन करण्याच्या प्रस्तावामुळे त्याच्या सामाजिक व ऐतिहासिक महत्त्वाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेषतः शेतकरी दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि शेतीमालाला मिळणाऱ्या अपुऱ्या दरामुळे आर्थिक संकटात असताना अन्नदात्याचे प्रतीक असलेला पुतळा हटविण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रस्तावाकडे सामाजिक संवेदनशीलतेबरोबरच राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जाण्याची शक्यता आहे.
शहरातील महत्त्वाचा मार्ग असलेल्या महावीर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा हा मार्ग व्हीआयपी मार्ग आहे. या मार्गावर सिद्धार्थ उद्यानाच्या पुढे सुभेदारी विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विभागीय आयुक्त कार्यालय असल्याने वरिष्ठ अधिकारी आणि विविध मान्यवरांची नियमित ये-जा असते.
याच पार्श्वभूमीवर कार्तिकी चौकाला आकर्षक स्वरूप देण्याची कल्पना पुढे आल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रस्तावित चौकाचे नाव कमळ चौक ठेवण्याची चर्चा असल्याने त्याला राजकीय रंग मिळण्याची शक्यता आहे. कमळ हे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह असल्याने सार्वजनिक जागेवरील चौकाच्या विकासामागे राजकीय हेतू आहे का, असा सवाल उपस्थित होऊ शकतो.
त्यामुळे या प्रस्तावावर आयुक्तांकडून घेतला जाणारा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, कमळ चौक विकसित करण्यासंदर्भातील फाईल महिनाभरापासून महापालिकेत फिरत असून, आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे ती पोहोचली आहे. या विषयावर नुकतीच बैठक झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता प्रस्तावाला मंजुरी मिळते की कार्तिकी चौकातील शेतकरी पुतळा कायम ठेवला जातो, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
बळीराजाचे प्रतीक हटविण्याचा घाट ?
कार्तिकी चौकातील शेतकरी पुतळा हा नगरपालिका काळातील वारसा मानला जातो. हातातील ज्वारीचे कणीस आणि शेतकऱ्याची प्रतिमा त्याच्या कष्टाची तसेच अन्नदात्याच्या योगदानाची आठवण करून देते. त्यामुळे चौकाच्या विकासाच्या नावाखाली हा पुतळा हटविण्यापूर्वी त्याचे सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व विचारात घेण्याची मागणी होऊ शकते. या पुतळ्याच्या जागी राजकीय पक्षाच्या चिन्हाशी साधर्म्य असलेले कमळ चौक उभारण्याचा प्रस्ताव असल्याने महापालिका प्रशासनाच्या भूमिकेला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.