छत्रपती संभाजीनगर : न्यू हनुमाननगर व पुंडलिकनगरचा काही भागांतील वीज बुधवारी (दि. २७) तब्बल १० तास गुल होती. तर काही भागांत सहा ते सात गुल होती. उन्हाच्या झळा आणि घामांच्या धारांमुळे या परिसरातील नागिरक हैराण झाले. अनेक भागांत तर या काळात सात ते आठ वेळा वीज ये-जा करत असल्याने अनेकांच्या विद्युत उपकरणांवर परिणाम झाला आहे.
बुधवारी पहाटे ४ च्या सुमारास न्यू हनुमानगर गल्ली नं. १ व परिसरातील वीज गुल झाली. पहाटेच्या वेळी वीज गुल झाल्याने अनेकांच्या झोपा उडाल्या. या परिसरातील वीज पुरवठा दोन तासांनंतर सुरळीत करण्यात आला. त्यानंतर मात्र या परिसरासहित इतर परिसरात विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणांत सुरू होता.
याबाबत कार्यालयांशी संपर्क साधला तर कोणी मिटिंगमध्ये होते तर काही अधिकारी काम करत असल्याने सांगण्यात आले. दुपारनंतर वीज पुरवठा पहाटेच्या नंतर मातोश्रीनगरातील रोहित्रांची देखभाल दुरुस्ती केल्यानंतरही विजेचा लपंडाव सुरूच होता.
सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक लोड वाढल्याने रोहित्र पूर्णपणे नादुरुस्त झाल्याची माहिती समोर आली. ती बदलण्यासाठी सायंकाळी ४ वाजेपर्यंत देखभाल दुरुस्तीचे काम सुरूच होते.
त्यामुळे सायंकाळी साडेचारच्या नंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. तब्बल दहा तास वीज गुल असल्याने परिसरातील नागरिकांना घामाघूम व्हावे लागले. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागला.
लपंडावाचा परिणाम विद्युत साहित्यांवर
हनुमाननगर गल्ली नं. ३,४,५ व इतर परिसरात दुपारी वीज सात ते आठ वेळा लपंडाव करत होती. यामुळे अनेक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणांवर याचा विपरित परिणाम झाला आहे. विजेच्या लपंडावामुळे हताश झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कोणी बैठकीत होते तर कोणी फोनच उचलत नव्हते. त्यामुळे वीज नक्की कधी येणार या बाब माहिती मिळत नसल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.