

मुंबई: दादर, शितलादेवी आणि माटुंगा रोड परिसरातील बेस्ट वीज ग्राहकांना गुरुवारपासून दीर्घकाळ वीजपुरवठा खंडीत झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले. शीतलादेवी रिसिव्हिंग सबस्टेशनमधून होणारा वीजपुरवठा मुख्य केबलमधील बिघाडामुळे जवळपास 14 तास येथे वीज नव्हती. त्यामुळे भर उन्हाळ्यात येथील नागरिकांचे हाल हाल झाले.
दादर ते माटुंगा रोड परिसरात जवळपास 3,000 बेस्ट वीज ग्राहक आहेत. गुरुवारी पहाटे 4.30 ते 5.30 च्या दरम्यान पहिला वीजपुरवठा खंडित झाला. पुन्हा सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दुसऱ्यांदा मोठा वीजपुरवठा खंडित झाला. शुक्रवारी सकाळपर्यंत विजेचा हा लपंडाव सुरूच होता असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
दरम्यान, उन्हाळ्यात वाढते तापमान आणि एअर कंडिशनरच्या मोठ्या वापरामुळे मुंबईतील विजेची मागणी 4,500 मेगावॅटच्या पुढे गेली आहे. त्यामुळे विजेच्या पुरवठ्यावर अतिरिक्त दाब येत आहे. सुरुवातीला येथील पुरवठा केबलचे किरकोळ नुकसान झाले होते. नंतर मोठ्या वीजपुरवठा समस्येत त्याचे रूपांतर झाल्याचे बेस्ट अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वारंवार बिघाड आणि वाढती मागणी
विजेच्या फीडरमध्ये होणारी वारंवार बिघाड आणि विजेच्या वाढत्या मागणीमुळे अशा घटना होत आहेत. मात्र भर उन्ह्याळात वारंवार वीज खंडित होऊ लागल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.