Kannad taluka zp election
कन्नड, पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली आहे. एकूण ७८ उमेदवारी अर्ज वैध होते, त्यापैकी २६ जणांनी मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे अखेर ५२ उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. तसेच पंचायत समिती गणासाठी १७३ उमेदवारी अर्ज छाननी अंती होते, त्यापैकी ७२ जणांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे अखेर १०१ उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत.
उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेत राजकीय नेते आणि उमेदवारी निश्चित झालेल्या उमेदवारांनी दोन दिवस अपक्ष उमेदवारांच्या मानधरणीत भेट देऊन संवाद साधला. या प्रयत्नामुळे अनेक उमेदवारांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे गट आणि गण निवडणुकीत संघर्ष अधिक स्पष्ट झाला आहे.
तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गटांमध्ये ५२ आणि १६ पंचायत समिती गणांमध्ये १०१ उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. या निवडणुकीत महायुतीतर्फे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आहेत. याशिवाय काँग्रेस, उबाठा आणि रायभान जाधव विकास आघाडी स्वबळावर सहभागी होत असल्याने तालुक्यात पंचरंगी लढत अपेक्षित आहे.
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, उमेदवारांची निवड, मागे घेण्याच्या हालचाली आणि पक्षांची रणनीती यामुळे मतदारांच्या निर्णयावर मोठा परिणाम होऊ शकतो. काही गटांमध्ये निरनिराळ्या धोरणात्मक युती आणि तटस्थ उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मतदारांचा निर्णय केवळ पक्षावर नाही, तर उमेदवाराच्या प्रतिमेवर, स्थानिक समस्यांवर आणि गटांतील संतुलनावर आधारित ठरेल. असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
स्थानिक राजकारणात होणार बदल
तालुक्यातील या पंचरंगी संघर्षातून स्थानिक राजकारणात बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः महायुती व विरोधी पक्षातील आमनेसामने लढत, स्थानिक नेत्यांची रणनीती आणि स्वबळावर उमेदवारांचा प्रभाव या सर्व गोष्टींचा भविष्यातील धोरणात्मक परिणाम पाहायला मिळणार आहेत.