jammer was attached car, call received high official, team released car without fine
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: रस्त्यावर बेशिस्तपणे उभी असलेली सर्वसामान्यांची वाहने उचलून त्यांना हजारो रुपयांचा भुर्दंड लादणाऱ्या महापालिकेच्या 'नागरी मित्र पथका' चा दुटप्पीपणा चव्हाट्यावर आला आहे.
मंगळवारी (दि. ११) सकाळी जालना रोडवरील एका नाश्ता सेंटरसमोर चक्क भररस्त्यात उभ्या असलेल्या कारला जॅमर लावल्यानंतर एका बड्या 'शिस्तप्रिय' पदाधिकाऱ्याच्या स्वीय सहाय्यकाचा फोन आला आणि पथकाने शेपूट घालत विनादंड कार सोडून तेथून पळ काढला. या संतापजनक प्रकारामुळे मनपाचा कायदा फक्त गरिबांसाठीच आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
जालना रोडवरील उच्च न्यायालयाजवळील सर्व्हिस रोडवर मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. एका नाश्ता सेंटरसमोर एक कार भररस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरेल अशी उभी होती. यावेळी मनपाच्या नागरी मित्र पथकातील कर्मचाऱ्याने आपली 'ड्युटी' बजावत या कारला जॅमर लावला. कारवाई सुरू झाल्याने नागरिकांचे लक्ष वेधले गेले. कार मालकाने कारवाई टाळण्यासाठी गयावया सुरू केली. हा खेळ सुरू असतानाच नाश्ता सेंटरमधून एक कामगार बाहेर आला आणि त्याने थेट पथकातील कर्मचाऱ्याच्या हातात आपला मोबाईल दिला.
या मोबाईलवर पलीकडून काहीतरी 'आदेश' आला आणि क्षणात कारवाईचे चित्रच बदलले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फोन मनपाच्या कामकाजाचा गाडा हाकणाऱ्या एका प्रमुख आणि स्वतःला 'शिस्तप्रिय' म्हणवून घेणाऱ्या पदाधिकाऱ्याच्या स्वीय सहाय्यकाचा होता. या फोननंतर नागरी मित्र पथकाच्या कर्मचाऱ्याने मुकाट्याने जॅमर काढला आणि कारला कोणताही दंड न लावता रिकाम्या टोइंग व्हॅनसह तेथून काढता पाय घेतला.
धक्कादायक बाब म्हणजे, कारवाई टळल्यानंतरही ती कार पुढील तासभर त्याच ठिकाणी भररस्त्यात उभी होती. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईत कायद्यापेक्षा 'फोन'ला अधिक महत्त्व आहे का? आणि संबंधित पदाधिकारी अशा बेशिस्त वाहनधारकांना पाठीशी का घालत आहेत, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
कारवाईचा निकष काय ?
महापालिकेच्या पथकाने वाहनावर कारवाई सुरू केल्यानंतर ती मध्येच एका फोनवर कशी थांबविली जाते? सर्वसामान्यांची गाडी दिसली की लगेच उचलणाऱ्या या पथकाचे कारवाईचे निकष नेमके आहेत तरी काय? नियमबाह्य पार्किंग आढळल्यानंतर कोणत्या परिस्थितीत दंड माफ केला जाऊ शकतो, याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.
गाडी सोडण्यासाठी आलेल्या फोनवर बोलताना पथकातील कर्मचारी. लहान वाहनांवर कारवाई, मोठ्यांना अभय महापालिकेच्या नागरी मित्र पथकाकडून रस्त्यावर बेशिस्तपणे उभी असलेल्या वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र यात इतर जिल्ह्यातील वाहन व छोट्याप्रकरच्या कारवरच कारवाई केली जाते. मात्र मोठ्या वाहनांना या पथकाकडून अभय दिले जात असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात असून, पथकाच्या दुटप्पी धोरणाविरोधात वाहनधारकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
हॉटेलसमोर कारवाईस पथक धजावेना !
महापालिकेच्या नागरी मित्र पथकाच्या कारवाईवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उच्च न्यायालयाच्या बाजूने सिडकोकडे जाणाऱ्या सव्र्व्हिस रोडवर हे पथक केवळ 'ग्रीन बेल्ट'च्या बाजूने उभी असलेली सर्वसामान्यांची वाहने उचलून नेतात. मात्र रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मोठ्या हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांसमोर आलिशान गाड्या राजरोसपणे उभ्या असतात, तिकडे पाहण्याची हिंमतही हे पथक दाखवत नाही. हा दुजाभाव का ? मनपाची उचलेगिरी फक्त गरिबांसाठीच आहे का? असा सवाल नागरिकांतुन उपस्थित केला जात आहे.
कारवाईची नोंद तपासणार कोण ?
नियम असा आहे की, वाहनाला जॅमर लावणे, तो काढणे आणि दंड न आकारता वाहन सोडणे या संपूर्ण प्रक्रियेची नोंद पथकाकडे असणे अनिवार्य आहे. या नोंदीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यास कारवाई का आणि कोणाच्या सांगण्यावरून थांबविण्यात आली, याचा पर्दाफाश होऊ शकतो. प्रशासनाने मंगळवारी घडलेल्या या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी.