राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात मुलींच्या घटत्या जन्मदराने चिंता वाढवली असताना जालना जिल्ह्यातील स्थिती गतवर्षीपेक्षा गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर यंदाच्या आर्थिक वर्षात 838 इतका घटल्याने मराठवाडा विभागात जालना तळाला गेला आहे. जालन्यात दर हजार मुलांंमागे 162 मुली कमी आहेत. तुलनेत संभाजीनगर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील मुलींच्या जन्मदराची स्थिती सुधारली आहे.
मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी देशभरात प्रयत्न सुरू आहेत. शासनानेही वाढत्या स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रसूतिपूर्व निदानतंत्र (विनियमन व दुरुपयोगावरील प्रतिबंध) कायदा 1994 लागू केला आहे. त्यानुसार प्रसूतिपूर्व लिंगनिदान करणे गुन्हा आहे. तसेच मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून कठोर कायदेही केले आहेत. मात्र यानंतरही मुलींचा जन्मदर वाढलेला नाही.
यासंबंधी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांपैकी जालना जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर सर्वात कमी आहे. गतवर्षी जिल्ह्यात दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 865 इतके होते. यावर्षी हेच प्रमाण आणखी कमी होऊन 838 इतके खाली घसरले आहे.
बीड शेवटून दुसरा, धाराशिव-लातूरमध्येही जन्मदर घटला
लातूर विभागातील बीड जिल्हा गतवर्षी शेवटच्या क्रमांकावर होता. यंदा शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावर्षी अवघ्या एका संख्येने जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढून 861 वरून 862 झाला आहे. दुसरीकडे धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतही मुलींचा जन्मदर घटला आहे. धाराशिवमध्ये मुलींचा जन्मदर 921 वरून 915, तर लातूरमध्ये 932 वरून मुलींचा जन्मदर 923 पर्यंत खाली घसरला आहे. नांदेडची स्थिती 923 वरून 934 पर्यंत सुधाल्याने किंचित दिलासा आहे.
मुलींचा जन्मदराबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची स्थिती सुधारली आहे. 2024-25 मध्ये जिल्ह्यात दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 918 होते. 2025-26 यावर्षी हेच प्रमाण 951 पर्यंत वाढले आहे. परभणी जिल्ह्याचा जन्मदर 912 वरून 929, तर हिंगोलीचा 872 वरून 887 इतका वाढला आहे.