Irregularities in the work under the Jal Jeevan Mission
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या नळपाणीपुरवठा योजनांमध्ये मोठ्या अनियमितता झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. एकूण ७३ नळपाणी योजनांमध्ये गंभीर त्रुटी व अनियमित कामे झाल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले असून संबंधित अधिकारी, कंत्राटदार व संस्थांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. स्पष्टीकरणानंतर पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (दि.१२) नागपुरात विधानसभेत दिली.
दरम्यान, या पैकी २५ योजनांची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही मंत्री पाटील यांनी दिले. जलजीवन मिशनच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे साहित्य, अपूर्ण कामे, अतिरिक्त खर्च दाखवणे, तसेच तांत्रिक मानदंडांचा भंग केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत.
या प्रकरणी आ. प्रशांत बंब, आ. विलास भुमरे व आ. संजना जाधव यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडत गंभीर आरोप केले. कार्यकारी अभियंते, कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापन समित्या आणि तपासणी संस्थांच्या संगनमताने मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा त्यांनी आरोप केला. अनेक गावांमध्ये नळजोडणी पूर्ण न होता देखील काम पूर्ण दाखवल्याचे प्रकारही निदर्शनास आल्याची माहिती आमदारांनी दिली.
डीपीडीसीच्या बैठकीतही कामांबाबत वारंवार प्रश्न
दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही या कामांबाबत वारंवार प्रश्न उपस्थित झाले होते. खर्चाच्या तुलनेत प्रत्यक्ष लाभ किती गावांपर्यंत पोहोचला?, जलउपलब्धता किती सुधारली?, याबाबत समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
जलजीवन मिशन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
दरम्यान कंत्राटदारांची थकित बिले, निकृष्ट कामांच्या तक्रारी, पाइपलाइन फुटी, पाणीपुरवठा सुरू न होणे अशा एकापेक्षा एक तक्रारींमुळे जलजीवन मिशन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. चालू चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाईसह काही प्रकरणांत गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.