उद्योग अडचणीत; उद्योगमंत्री संभाजीनगरात file photo
छत्रपती संभाजीनगर

उद्योग अडचणीत; उद्योगमंत्री संभाजीनगरात

हतबल उद्योजकांनी मांडले गाऱ्हाणे, पर्यायी इंधन वापरावर मंथन

पुढारी वृत्तसेवा

Industry in Distress; Industries Minister in Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस टंचाई निर्माण होऊन छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील सर्व प्रकारचे हजारो उद्योग अडचणीत आले आहेत. त्यामुळे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (दि.१२) रात्री संभाजीनगरात येऊन उद्योजकांच्या अडचणी जाणून घेतल्या. बहुसंख्य उद्योगांकडे पुढील चार ते पाच दिवस पुरेल इतकाच गॅस आहे. पर्यायी व्यवस्था झाली नाही तर सुमारे चार हजार उद्योग बंद पडतील, अशी भीती यावेळी उद्योजकांनी व्यक्त केली.

पाईपलाईनमधून युद्धपातळीवर गॅस कनेक्शन

छत्रपती संभाजीनगरात बीपीसीएल कंपनीने पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यास नुकतीच सुरुवात केली आहे. वाळूज, शेंद्रा, बिडकीन आदी परिसरात कंपनीने गॅस लाईन टाकली आहे. या गॅस लाईनवरून उद्योगांना युद्धपातळीवर गॅस कनेक्शन उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून उद्योगांची सध्याची अडचण दूर होईल, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले. उद्योगमंत्री सामंत यांनी शहरातील हॉटेलात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील उद्योजक, गॅस कंपन्यांचे अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय

उद्योग अडचणीत; उद्योगमंत्री संभाजीनगरात

अधिकारी यांची बैठक घेतली, या बैठकीस महाराष्ट्र राज्य औद्योगिक शहर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पी. डी. मलिकनेर, सह. संचालक एम आय डी सी डॉ. विजय राठोड, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड, भारत पेट्रोलियमचे क्षेत्रीय व्यवस्थापक मनोजकुमार यादव तसेच उद्योग संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार उद्योग आहेत. बहुसंख्य उद्योगांना गॅसची नियमित गरज असते. मात्र सध्या या उद्योगांकडे चार ते पाच दिवसांचा गॅस उपलब्ध आहे. सध्या गॅस मिळणे कठीण झाले आहे. इंधनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोळशाचे भाव वाढले आहेत, अशीच परिस्थिती राहिली तर येत्या काही दिवसांत हे सर्व उद्योग बंद पडतील, अशी भीती यावेळी उद्योजकांनी बोलून दाखविली.

कमी दरात वीज उपलब्ध करून देणे, अन्य इंधनाचा पर्याय, सौर ऊर्जा धोरणात बदल करणे इ. उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आली. त्यावर उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, युद्धजन्य परिस्थितीच्या काळात साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. उद्योगांना इंधन उपलब्धतेसाठी तात्काळ व दुरगामी उपाययोजना निश्चित कराव्या. उद्योजक आणि स्थानिक प्रशासन यांनी मिळून प्राधान्यक्रम ठरवावा, त्यासाठी केंद्र शासनाने जारी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव करावा, असे निर्देशही सामंत यांनी आज दिले, येथे करण्यात आलेल्या उपाययोजना राज्यात इतरत्रही राबविता याव्यात, अशी शासनाची भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्योगांसाठी पर्यायी इंधन म्हणून वांबूचा वापर वाढविण्याचा विषय बैठकीत केंद्रस्थानी राहिला. बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, बांबू हार्वेस्टिंगच्या मशिनरी महागड्या आहेत, त्याला शासनाने अनुदान दिले पाहिजे, अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली.

त्यावर उद्योगमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच उद्योजक बांबूची लागवड करणार असतील तर त्यांना औद्योगिक क्षेत्रातील ओपन स्पेसच्या जमिनी उपलब्ध करून दिल्या जातील, त्याबाबत धोरणात्मक निर्णय लवकरच घेऊ, असेही उद्योगमंत्री म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT