Sambhajinagar News : अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत : पोलिस अधीक्षक file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत : पोलिस अधीक्षक

एलसीबीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची कानउघाडणी; ५ हायवांसह वाळू जप्त

पुढारी वृत्तसेवा

Illegal activities will not be tolerated: Superintendent of Police

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पदभार स्वीकारताच नवनियुक्त पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही, असा थेट इशारा दिला आहे. पोलिस दलातील सुस्तावलेल्या आणि वेगळा रस असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही चांगलेच कान उपटले. तुमचे मुख्य काम गुन्ह्याची उकल करणे, गुन्हेगारांचा शोध घेणे आणि नागरिकांचा मुद्देमाल परत मिळवणे हेच आहे.

बेसिक पोलिसिंग सोडून कोणी इतर कामांमध्ये गुंतलेला आढळला, तर गय करणार नाही, अशा इशारा पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिला आहे. एसपींच्या या आक्रमक पवित्र्यानंतर अवघ्या काही तासांतच जिल्ह्यात नाकाबंदी करून ५ हायवा आणि १९ ब्रास अवैध वाळू जप्त करत वाळूमाफियांचे कंबरडे मोडण्यात आले आहे.

आयपीएस अधिकारी प्रकाश जाधव यांनी २६ मे रोजी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदाची धुरा हाती घेताच आपली कार्यपद्धती स्पष्ट केली होती. त्यांनी अवैध धंदे, वाळूमाफिया आणि गोवंश तस्करांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. दहशतवाद विरोधी कक्ष, आर्थिक गुन्हे शाखा आणि वाहतूक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर बुधवारी एलसीबीची बैठक बोलावली होती.

नेहमीप्रमाणे केवळ कागदी सूचना मिळतील या आविर्भावात आलेल्या एलसीबीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षकांच्या आक्रमक पवित्र्याचा सामना करावा लागला. पोलिस अधीक्षकांनी एलसीबीची कानउघाडणी करताच पोलिस दल अॅक्शन मोडमध्ये आले. ३ जून रोजी रात्रीच्या सुमारास गंगापूर, शिल्लेगाव, विरगाव, पैठण, अजिंठा, पिशोर आणि करमाड या सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करत वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या. या मोहिमेत १९ ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली, तर अवैध वाहतूक करणारे ५ हायवा आणि २ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. पोलिस अधीक्षकांच्या एकाच इशाऱ्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्याची पहिली जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेची आहे. नुकतेच कारागृहातून जामिनावर सुटलेल्या किंवा शिक्षा भोगून बाहेर आलेल्या गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवा. मूळ कर्तव्य सोडून कोणी अन्य कामात आढळला, तर गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकरी, महिला आणि औद्योगिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य : ग्रामीण भागात शेतातील मोटारपंप आणि जनावरे चोरीला जाण्याचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी कडक पावले उचलली जातील. महिलांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभल्याने घृष्णेश्वर, वेरूळ आणि अजिंठा येथे येणाऱ्या देश-विदेशांतील पर्यटकांना पूर्णपणे भयमुक्त वातावरण दिले जाईल. यासोबतच जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात भर टाकणाऱ्या करमाड, बिडकीन आणि चिकलठाणा परिसरातील उद्योगांना चोख सुरक्षा पुरवण्यासाठी आणि उद्योजकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी लवकरच उद्योजकांची बैठक घेणार आहे. ग्रामीण भागातील तरुणाईला उद्ध्वस्त करणारी नशेखोरी आणि अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी कारवाईचे आदेश दिले आहेत.
- प्रकाश जाधव, पोलिस अधीक्षक (ग्रामीण)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT