If the CCTV in the center is found to be switched off, it is a direct crime
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण विभाग आता मॲक्शन मोडफ्वर आला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णवेळ कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून, फुटेजमध्ये काही गडबड किंवा छेडछाड आढळल्यास संबंधित केंद्र संचालकांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिला आहे.
सध्या राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा सुरू असून, लवकरच दहावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. केवळ कॅमेरे लावून चालणार नाही, तर परीक्षा कालावधीत होणाऱ्या सर्व घडामोडींचे सातत्याने आणि अखंडित रेकॉर्डिंग होणे अत्यावश्यक आहे, असे लाठकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान शिक्षणाधिकाऱ्याच्या या निर्णयामुळे शाळा संचालकांमध्ये धास्ती पसरली असून सीसीटीमुळे परीक्षा पादर्शकपणे होण्याची आशा आहे.
परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची पायरी असून, तिची पारदर्शक आणि प्रामाणिक अंमलबजावणी ही सर्व संबंधितांची सामूहिक जबाबदारी आहे. परीक्षा प्रक्रियेची शुचिता आणि विश्वासार्हता जपण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा अखंडितपणे सुरू ठेवणे अनिवार्य आहे. यात कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
फुटेज जतन करण्याची जबाबदारी संचालकांवर
सीसीटीव्ही फुटेज सुरक्षितरीत्या जतन करणे ही सर्वस्वी केंद्र संचालकांची जबाबदारी राहणार आहे. परीक्षा कालावधी संपल्यानंतर संबंधित सीसीटीव्ही रेकॉर्डिंगची हार्ड डिस्क किंवा डेटा माध्यमिक शिक्षण विभागाकडे जमा करणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि प्रामाणिकता अबाधित राखली जाईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हे केल्यास होणार कारवाई
सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणतीही छेडछाड, फेरफार किंवा
अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न झाल्यास.
परीक्षा कालावधीत कॅमेरे बंद ठेवल्यास किंवा यंत्रणेत
जाणीवपूर्वक बिघाड केल्यास.
फुटेजमध्ये कोणताही गैरप्रकार किंवा अनियमितता निदर्शनास आल्यास.