Heavy rains wreak havoc in Paithan taluka
पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यात शनिवारी (दि.१३) मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पीक व नागरिकांच्या घरांची पडझड झाली. दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.
मुसळधार पाऊस पडत असल्याने येथील जायकवाडी धरणात वरील भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक रात्री सुरू झाल्यामुळे तातडीने पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, धरण उपअभियंता मंगेश शेलार यांनी धरणाचे आपत्कालीन परिस्थितीत निर्माण होऊ नये यासाठी धरणाचे ९ आपत्कालीन दरवाजे सह संपूर्ण २७ दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला होता. धरणाच्या वरील भागात मुसळधार पाऊस सुरू असताना पहाटे गोदामाई दुथडी भरून वाहत होती.
शनिवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळल्यामुळ शेतकऱ्यांच्या शेतीतील सोयाबीन, तुरी, मोसंबी, डाळिंब क्षेत्राच्या शेतामध्ये कमरेएवढे पाणी साचले. शेतकऱ्यांचे मोठी नुकसान झाले आहे. पाटेगाव येथील सिद्धेश्वर महाराज खैरमोडे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत पावसाचे पाणी शिरल्याने वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कपडे भजन साहित्यांचे नुकसान झाले. पैठण शहरातील इंदिरानगर, सराफनगर यासह अनेक भागातील लोकवस्तीमध्ये पाणी शिरल्यामुळे बहुतांश नागरिकांनी रात्री जागून काढली. शहरातील गंगा मंदिरावर वीज कोसळल्यामुळे मंदिराचे काही प्रमाणावर नुकसान झाले.
शनिवारी रात्री पैठण तालुक्यातील विविध महसूल मंडळात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आल्याची माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली. पैठण २००, पिंपळवाडी पि १५०, बिडकीन ६३, ढोरकीन ११६, बालानगर १००, नांदर २१९, आडुळ ५१, पाचोड १०२, लोहगाव १५९, विहामांडवा १९७ मिलिमीटर झाला आहे. आत्तापर्यंत ६८४७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
शनिवारी पैठण तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने आमदार विलासबापू भुमरे यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान उपस्थित असलेल्या तहसीलदार ज्योती पवार यांनी नुकसान झालेल्या विविध गावांतील शेती व नागरिकांच्या घरांची माहिती पंचनामा संकलन करून तातडीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांच्याकडे सादर करणार असल्याचे सांगितले.