पैठण : पैठण तालुक्यात जोरदार सुरू असून विहामांडवा व सालवडगाव शिवारात वीज कोसळून १५ जनावरांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि.२२) दुपारी घडली. वीज पडून मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना शासनाच्या वतीने योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दिली.
आज (रविवारी) दुपारी पैठण तालुक्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला. दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान विहामांडवा परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस होऊन जानकाबाई शकील चव्हाण (रा. सालवडगाव) यांच्या शेती वस्तीवरील गट नंबर ५४५ येथे वीज पडून गाभण असलेल्या ६ मेंढ्या एका कोकरुचा मृत्यू झाला. यासह सालवडगाव येथे मोमीन चव्हाण यांच्या वस्तीवरील ७ मेंढ्या व नानेगाव येथील शेतकरी विष्णू माने यांच्या एका म्हशीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर तात्काळ उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार सारंग चव्हाण यांनी संबंधित गावाच्या तलाठ्यांना पंचनामा करण्याचा आदेश दिला. नियमानुसार वीज पडून मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना शासनाच्या वतीने योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दिली आहे.