पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : कन्नड तालुक्यातील हतनूर–घुसूर रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात

प्रशासनाचे दुर्लक्ष, घुसूर ग्रामस्थांचा संताप; तातडीने दुरुस्तीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कन्नड/हतनूर : तालुक्यातील हतनूर–घुसूर हा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवास जीवघेणा बनला आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत सन २००८ मध्ये या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने आज हा रस्ता अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे.

या मार्गावरून दररोज शालेय बस, दूध संकलन करणारी वाहने, शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चारचाकी वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असून, दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका सतत निर्माण झाला आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली असून, वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही.

संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने व पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजविणे, डांबरीकरण करणे आणि रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी वसंत काळे, राजू काळे, अशोक बागडे, योगेश बागडे यांच्यासह घुसूर ग्रामस्थांनी केली आहे.

अपघाताची भीती

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाने व संबंधित विभागाने पाठ फिरवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे रोजची कसरत बनली आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास मोठा अपघात होण्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT