गंगापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुलभव्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गंगापूर आगाराने विशेष नियोजन केले आहे. आगारातून तब्बल ३४ विशेष एसटी बस मुंबई व कोकणातील विविध मार्गांवर रवाना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना गावाकडे जाण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली असली, तरी त्याचा फटका आता स्थानिक प्रवाशांना बसत आहे. मोठ्या संख्येने बसगाड्या विशेष सेवेसाठी बाहेर गेल्याने ग्रामीण भागातील नियमित बससेवा विस्कळीत झाली आहे.
गणेशोत्सवासाठी ३४ बसगाड्या बाहेरगावी रवाना झाल्यामुळे १२ ते १५ सप्टेंबरदरम्यान गंगापूर आगारातून धावणाऱ्या बहुतांश स्थानिक व नियत बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत परिणामी तालुक्यातील ग्रामीण भागातून गंगापूर शहरात येणारे विद्यार्थी, शेतकरी, महिला, नोकरदार तसेच बाजारपेठेतील कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
एसटीच्या नियमित फेऱ्या रद्द झाल्याने अनेक प्रवाशांना नाईलाजाने खासगी जीप, प्रवासी वाहने आणि अन्य पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. एसटीच्या तुलनेत खासगी वाहनांसाठी अधिक भाडे मोजावे लागत असल्याने ग्रामीण प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या विशेष वाहतुकीचा फायदा गणेशभक्तांना होत असला, तरी स्थानिक प्रवाशांच्या खिशाला मात्र आर्थिक झळ बसत आहे. गणेशोत्सवाच्या काळात आधीच प्रवाशांची संख्या वाढलेली असताना स्थानिक एसटी फेऱ्या कमी झाल्याने खासगी वाहनांवरही मोठा भार पडत आहे.
ग्रामीण भागातील अनेक मार्गावर एसटी हीच प्रवाशांची प्रमुख आणि तुलनेने स्वस्त वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळे अचानक फेऱ्या रद्द झाल्याने नागरिकांना पर्यायी वाहतुकीचा शोध घ्यावा लागत आहे. विशेषतः शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह रोजंदारीवर काम करणारे नागरिक आणि शेतकऱ्यांना याचा अधिक फटका बसत आहे. वेळेवर वाहन न मिळणे, मिळाल्यास अधिक भाडे आकारले जाणे आणि गर्दीतून प्रवास करावा लागणे, अशा अडचणींना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.
पर्यायी व्यवस्था करा, प्रवाशांची मागणी
गणेशोत्सवासाठी पाठविण्यात आलेल्या ३४ विशेष बसगाड्यांमुळे १५ सप्टेंबरपर्यंत स्थानिक व नियत बसफेऱ्यांवर परिणाम राहणार आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी विशेष बससेवा आवश्यक असली, तरी स्थानिक प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी बसव्यवस्था करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ही तात्पुरती परिस्थिती असून, प्रवाशांनी आगार प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आगारप्रमुखांनी केले आहे.