

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ऐन मान्सूनात पावसाने दीड मारली आहे. २१ जूनमध्ये २१, जुलै १२ आणि ऑगस्टचे २६ असे तीन महिन्यांतील ९२ दिवसांपैकी तब्बल ५९ दिवस पावसाने दडी मारली. त्यानंतर सप्टेंबरचेही ११ दिवस कोरडे गेल्यानंतर शनिवारी (दि. १२) दुपारी तीन तास पावसाची रिपरिप सुरू राहिली. जिल्ह्यातही अनेक मंडळांमध्ये पावसाची हजेरी लागली असून चिकलठाणा वेध शाळेत ५ मि.मी. एवढी नोंद झाली.
हवामान विभागाने अगोदरच अलनिनोमुळे पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार यंदा मान्सूनमध्ये जून, जुलैसोबतच ऑगस्टमध्येही पावसाचे प्रमाण कमीच राहिले. १ जून ते १२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ४८१ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षीत होते. त्यातुलनेत ४०० मि.मी. पावसाचीच हजेरी लागली आहे.
ऑगस्टमध्ये १५३ मि.मी. अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ४८.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वात कमी छत्रपती संभाजीनगर, पैठण आणि खुलताबाद या तीन तालुक्यांत पाऊस झाला आहे.
दरम्यान, ऑगस्टमधील ५ दिवस वगळले तर तब्बल २६ दिवस पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरिपाचे पीक अडचणीत आले आहे. जवळपास सर्वच तालुक्यांत सारखीच स्थिती असून सुमारे १२ टक्के पीक नुकसानीचे संकेत कृषी विभागाने दिले आहे. शेतकरी चिंतेत असतानाच शनिवारी अचानक वातावरणात बदल होऊन दुपारी १ वाजता पावसाला सुरुवात झाली.
केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील बहुतांश मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता थोड्याप्रमाणात कमी झाली आहे. शहरात जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस झाला आहे. तीन तास झालेल्या रिपरिपची चिकलठाण्यात ५ मि.मी. एवढी नोंद झाली आहे.
काही भागांतच हजेरी
शहरात दोन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली. परंतु, हा पाऊस शहरातील सिडको, जाधववाडी, चिकलठाणा, हसूल या भागातच बरसला. त्याअगोदर १ सप्टेंबरलाही हलक्या सरीकोसळल्या. ऑगस्टमध्ये १ व २ आणि १९, २२, २३ अशी पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
चिकलठाणा वेध शाळा - ५ मि.मी.
एमजीएम विद्यापीठ - १०.२ मि.मी.
एमजीएम पडेगाव - ११.२ मि.मी.