छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाला शासनाकडून निधी न मिळाल्याने विविध योजनांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. आठ महिन्यांपासून एपीएल गटातील शेतकऱ्यांचे धान्य अनुदान प्रलंबित असून शिवभोजन केंद्रांचा निधी सात महिन्यांपासून थकीत आहे. रेशन दुकानदारांचे कमिशनही तीन महिन्यांपासून रखडले आहे. ही स्थिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
एपीएल गटातील गरीब शेतकरी कुटुंबांना धान्याऐवजी थेट रोख अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता; मात्र एप्रिल २०२५ पासून या योजनेसाठी निधी उपलब्ध झालेला नाही. सध्या सुमारे ३५ कोटी रुपयांचे अनुदान थकीत असल्याचे समजते. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना ना धान्य मिळत आहे, ना रोख रक्कम.
दरम्यान, शिवभोजन योजना चा निधीही सात महिन्यांपासून आलेला नाही. जिल्ह्यात ११० केंद्रे कार्यरत असून शहरात प्रति थाळी ४० रुपये आणि ग्रामीण भागात २५ रुपये अनुदान दिले जाते. अनुदान न मिळाल्याने केंद्रचालक आर्थिक ताणाखाली आहेत. रेशन दुकानदारांना देण्यात येणारी मार्जिन मनीदेखील तीन महिन्यांपासून थकीत असल्याने वितरण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. संबंधित घटकांकडून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
धान्य अनुदान आणि शिवभोजन केंद्राच्या अनुदानाबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. आवश्यक रकमेची मागणी नोंदविलेली आहे. लवकरच हा निधी प्राप्त होईल, असे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आले. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही.प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी