वैजापूर : वैजापूर -श्रीरामपूर सीमेवरील असणाऱ्या शनिदेवगाव -कमालपुर बंधाऱ्यावरून जात असताना. चौघेजण गोदावरी नदीत पडल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१२) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. यात एक जणांचा मृत्यू झाला असून एकाला वाचण्यात यश आले आहे. तर दोघांचा अजून थांगपत्ता लागला नसून त्यांचा शोध सुरू आहे.
या घटने संदर्भात स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर -श्रीरामपूर सीमेवरील असणाऱ्या शनिदेवगाव - कमालपुर येथे एकाच दुचाकीवरुन जाणारे चौघे कमालपूर बंधाऱ्यावरून तोल जाऊन पडले. यातील एकाला नदीत मच्छीमार करणाऱ्या तरुणांनी वाचवले. तर एका वृद्धेचा मृतदेह सापडला असून अन्य दोघांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
या घटनेत सोमनाथ बर्डे (वय-३२),रवी सोमनाथ बर्डे (वय-३१),मॅचिंद्र गोपीनाथ बर्डे (वय ४५) व यनुबाई मनोहर बर्डे (वय ७६) असे तीन तरुण व एक वृद्ध महिला चौघेजण कमालपूरवरून शनिदेव गाव (ता. गंगापूर) येथे मृत वृद्ध यनूबाई यांना सोडवण्यासाठी चालले होते. दुचाकी गोदावरी नदीवरील कमालपुर येथील बंधाऱ्यावर मधोमध आल्यानंतर बंधाऱ्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीस्वराचा तोल गेला. बंधाऱ्याला संरक्षक कठडे नसल्याने दुचाकीवरील हे चौघेही नदीत पडले. पडताना त्यांना बंधाऱ्यातील लोखंडी ढाप्यांचा मार लागला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान ही घटना नदीत मासे पकडणाऱ्या काही तरुणांनी पाहताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आपल्या जवळील चप्पू पाण्यात फेकून मच्छिंद्र बर्डे यांना वाचवले. परंतू इतर दोघे खोल पाण्यात बुडाल्याने त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. तर वृद्ध यनुबाई हिचा मृतदेह हाती आला आहे. अन्य दोघांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.
बंधाऱ्यावरील रस्त्यावर फूट-फूटभर खड्डे पडलेले असल्याने असे जीवघेणे अपघात होत आहेत. कमालपूर, बाजाठाण व शनिदेवगाव येथील ग्रामस्थ व आदिवासी समाजातील तरुणांनी बंधार्यामध्ये शोध मोहीमेत मोठी मदत केली.
दरम्यान श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच विरगाव पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. यावर्षी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून यातील पाण्याचा फुगवटा कमालपूर बंधाऱ्यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. यामुळे बंधार्यात पडलेल्या तरुणांना शोधण्यात मोठी अडचण येत आहे.
दरम्यान वैजापूर- श्रीरामपूर दरम्यान असलेल्या या बंधार्यावर रोजच शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. तसेच या घटनेपूर्वी अनेक अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. या कारणाने स्थानिकांकडून बंधाऱ्याला संरक्षण कठडे बसवण्याची मागणी करण्यात येत आहे.