डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या ग्रामीण परिसरात दिवसेंदिवस उन्मत्त रिक्षावाल्यांचा मस्तवालपणा वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण-कसारा रेल्वेमार्गावर असलेल्या महागणपतीच्या टिटवाळ्यात धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.
रिक्षावाल्याला भाडे देण्यासाठी प्रवाशाने 50 रूपयांची नोट काढली. नोट फाटकी असल्याने रिक्षावाला आणि प्रवाशामध्ये जोरदार वाद झाला. वादादरम्यान झालेल्या झटापटीमुळे प्रवासी अंशूमन शाही यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून रिक्षावाला राजा भोईर याला अटक केली आहे.
टिटवाळ्यातील हरीओम व्हॅली बिल्डींग नंंबर 7 मध्ये अंशूमन शाही हे त्यांच्या कुटुंबासमवेत राहत होते. त्यांना एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. बाहेर कामानिमित्त गेलेले अंशूमन हे गुरूवारी रात्री रिक्षाने घराजवळ आले. अंशूमन यांनी केलेल्या प्रवासाचे भाडे देण्याकरिता 50 रूपयांची नोट काढली. रिक्षावाल्याने त्यांच्याजवळील 50 रूपयांची नोट फाटकी असल्याने घेण्यावरून वाद घातला. या वादात रिक्षावाला आणि अंशूमन यांच्या हाणामारी झाली. या हाणामारीदरम्यान अंशूमन बेशुद्ध होऊन रस्त्यावर कोसळले. हा प्रकार पाहून अंशूमन यांच्या घरच्यांसह परिसरातील रहिवासी जमा झाले. बेशुद्ध पडलेल्या अंशूमन यांना तत्काळ उचलून हॉस्पिटलला हलविले आहे. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे रिक्षावाले प्रवाशांसोबत अनेक कारणांवरून हुज्जत घालत असतात. टिटवाळ्यात घडलेल्या घटनेनंतर उन्मत्त रिक्षावाल्यांची गुंडगिरी अधोरेखित झाली आहे. रिक्षावाल्याने केलेल्या मारहाणीतून अंशूमन याचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
या संदर्भात तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश कदम यांनी सांगितले की, अंशूमन यांचा मृत्यू भांडणानंतर हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रिक्षाचालक राजा भोईर याच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आल्याचे वरीष्ट पोलीस निरीक्षक कदम यांनी सांगितले.