Farmers' loan waiver, Bachchu Kadu Phrahar's protest Kranti Chowk demands disabled people
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन द्या यासह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. २४) माजी मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत भर पावसात क्रांती चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनानंतर बच्चू कडू यांनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी तारीख जाहीर न करता मेंढपाळांसह मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याची घोषणा केली. आंदोलनानंतर बच्चू कडू यांनी अमरप्रित चौकात शिव-सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पोलिस त्यांना ताब्यात घेत असताना, आंदोलनकर्त्यांनी काही वेळासाठी पोलिसांची गाडी रोखून धरली. पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर बच्चू कडू यांना उस्मानपुरा पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज गुरुवारी अमरप्रित चौकात रास्ता रोको आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. त्यादृष्टीने पोलिस प्रशासनाने तयारीही केली होती. मात्र पावसामुळे रास्ता रोको आंदोलनात व्यत्यय आला. त्यामुळे क्रांती चौकात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपारी ४ वाजता बच्चू कडू यांचे क्रांती चौकात आगमन झाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून, चक्काजाम आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी कर्जमाफी आमची हक्काची, नाही कुणाची बापाची, दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये मानधन मिळालेच पाहिजे, फडणवीस सरकार हाय हायच्या घो षणांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचे आंदोलन हे कोणत्याही जाती-धर्माचे नाही. शेतकरी, मेंढपाळ, मच्छिमार सुरक्षित नाही. मेंढपाळांसाठी चराईला जागा ठेवण्यात आलेली नाही, तसेच शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा १५ टक्के जास्त उत्पन्न मिळवून देण्याची घोषणा केली होती, मात्र सध्या शेतकऱ्यांना हमी भावापेक्षाही कमी दराने मालाची विक्री करावी लागत आहे.
राज्यातील मेंढपाळ असो किंवा मच्छीमार, शेतकरी असो की दिव्यांग त्यांच्या मागण्यांकडे सत्ताधारी दुर्लक्ष करत आहेत. छत्रपतींच्या राज्यात वतनदारी पद्धत बंद करण्यात आली होती, मात्र आजच्या सरकारमध्ये रमीवाल्यांचा धंदा तेजीत असून, सरकारला रमीमधून ९ हजार कोटींचा कर मिळत आहे. त्यातूनच उद्योजकांचे पोट भरण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. यामुळे हे राम राज्य आहे किंवा रावण राज्य हे कळायला मार्ग नाही. कृषिमंत्री माणिक कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची धमक फडणवीस दाखवू शकत नाही, हे दुर्दैव आहे.
फडणवीस म्हणतात यावर्षी पीक परिस्थिती चांगली असल्याने कर्जमाफी देता येणार नाही. आता कर्जमाफीसाठी न सांगता मंत्रालयात घुसून आंदोलन छेडण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला. दरम्यान सकाळपासून प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह दिव्यांग संघटनेचे कार्यकर्ते क्रांतीचौकात जमा झाले होते. संघटनेचे अध्यक्ष बच्छ कडू येईपर्यंत कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवले. या आंदोलनात मनसेचे प्रकाश महाजन, प्रहारचे शहराध्यक्ष कुणाल राऊत, जिल्हा प्रमुख सुधाकर शिंदे, दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे, प्रहार शेतकरी जिल्हाध्यक्ष अनिल पालोदे, सुनीता खरात, पारसचंद साकला, युवा जिल्हाध्यक्ष कृष्णा गाडेकर, उपाध्याक्ष सुदाम गायकवाड, ज्योतीराम जाधव, संजय मिसाळ, कीर्ती देशपांडे, वंदना मुळे, राहुल काकडे, नरहरी कुलथे यांच्यासर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
आंदोलनकत्यांनी कृषिमंत्री यांच्याविरोधात घोषणाबाजी करत प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलनात पत्त्याचे डाव खेळून, पत्ते दाखवून कृषिमंत्र्यांच्या कृतीचा निषेध नोंदवला. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून पत्ते उधळण्यात आले.
प्रहार संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनात दुपारी जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी भेट देऊन, बच्चू कडू यांच्या आंदोलनाला समर्थन दिले. तसेच दुपारी दोन वाजेदरम्यान माजी खासदार एमआयएमचे प्रदे-शाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. तसेच दिव्यांगांना दहा हजारांपर्यंत मानधन जाहीर करावे, अशी मागणी जलील यांनी केली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी एखादा प्रकल्प कमी करावा. विधिमंडळात सर्वसामान्यांचा आवाज उठवला जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.