छत्रपती संभाजीनगर: शहानूरमिया दर्गा चौकातील अतिक्रमणधारकांवर महापालिका मेहरबान असल्याचे दिसून येत असून या चौकातील तिन्ही बाजूंची अतिक्रमणे हटवल्यानंतर हा चौक अतिक्रमणमुक्त केला असल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र संग्रामनगर उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या टपऱ्या, हातगाड्या आणि इतर लहान-मोठी अतिक्रमणे अद्याप कायम असल्याने परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. ही अतिक्रमणे हटवण्याऐवजी सत्ताधाऱ्यांकडून बाजार भरणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देत आहेत. या शहरातील प्रमुख चौकांपैकी एक शहानूरमिया दर्गा चौक हा वाहतूकीचा केंद्रबिंदू मानला जातो.
महापालिकेने नुकतेच या चौकातील अतिक्रमणे हटविली. त्यानंतर रस्ते तुलनेने मोकळे झाले असले तरी उड्डाणपुलाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गालगतच अतिक्रमणांचा विळखा कायम आहे. रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या टपऱ्या आणि व्यावसायिक अतिक्रमणांमुळे वाहनचालकांना अरुंद रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
विशेषतः सकाळी कार्यालयीन वेळी व सायंकाळच्या वेळी या भागात वाहतुकीचा ताण वाढतो. त्यामुळे चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि वाहतूक संथ गतीने पुढे सरकते. तसेच उड्डाणपुलाकडे वळण घेणाऱ्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल्सच्या बस आणि इतर अवजड वाहनांना वळण घेताना विशेष कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे चौकातील इतर तीन बाजूंप्रमाणेच उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या मार्गाशेजारील अतिक्रमणे हटविण्याची गरज आहे.
या मार्गावरील टपऱ्या आणि इतर अतिक्रमणे दूर केल्यास वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत होऊन कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने केवळ भाजी विक्रेत्यांवर कारवाईचा फास आवळण्याऐवजी या भागाकडेही लक्ष देऊन आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ - संध्याकाळ कोंडीचे संकट
संग्रामनगर उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या मार्गालगतच्या टपऱ्या आणि इतर अतिक्रमणांमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. सकाळी व सध्यांकाळी वाहतुकीची मोठ्याप्रमाणावर वर्दळ असते. या गर्दीच्या वेळी येथे वाहतूक खोळंबते, तर रात्री ट्रॅव्हल्स बस व इतर अवजड वाहनांना वळण घेताना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच या मार्गावर नेहमीच छोटे - मोठे अपघात घडत असतात. त्यामुळे ही अतिक्रमणे हटवणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे.