Due to the increase in LPG prices, it is not possible to afford to run a rickshaw on savings.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एलपीजीचे दर गगनाला भिडल्याने बचतीवर रिक्षा चालवून चार पैसे कमावण्यासाठी धडपडणाऱ्या रिक्षा चालकांना हा व्यवसाय परवडत नसल्याने अनेक रिक्षा चालकांनी कंपनीची वाट धरली आहे. बचतीवर काम करणारे चालक मिळत नसल्याने अनेक मालकांनीच रिक्षा चालवण्यास सुरुवात केली असल्याची माहिती या व्यवसायातील चालकांनी दिली.
एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षात बचत चांगली मिळत असल्याने अनेक रिक्षा चालकांनी बचतीवर रिक्षा चालवण्याचा व्यवसाय पत्कारला होता. यात रिक्षा मालकांनाही दिवसभरात चांगली कमाई होत होती. दरम्यान ६१ रुपयांचा एक लिटर गॅस तब्बल १२५ रुपयांपर्यंत वाढल्याने यातून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने अनेकांनी हा व्यवसाय सोडून कंपनीची वाट धरली आहे. दिवसभर मरमर करून हाती ३०० रुपयेच पडत होते. सर्व पैसे गॅस आणि रिक्षा मालकांच्या हाती जात होते. त्यामुळे अनेकांनी या व्यवसायाला रामराम ठोकल्याची माहिती रिक्षा चालकांनी दिली.
रिक्षा मालकच चालक
दरम्यान बचतीवर काम करणारे रिक्षा चालकांचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रिक्षा मालक स्वतः रिक्षा चालवत आहेत. तर काही मालक नाविलाजाने रिक्षा घरी लावून आपापल्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे रस्त्यावर धावणार एलपजीच्या रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे
पूर्वी ६०० ते ७०० रुपये मिळायचे
एका रिक्षाला दिवसभरात ५ लिटर गॅस लागतो. यात सुमारे १२०० ते १५०० रुपयांचा व्यवसाय होतो. यातील ३०० ते ४०० रुपये रिक्षा मालकांला बचत. पूर्वीच्या दराने गॅससाठी ३०० ते ३५० रुपये मेंटनस १०० रुपये जरी अपेक्षित धरले तरी रिक्षा चालकांच्या हाती ६०० ते ७०० रुपये पडत होते. दरम्यान गॅसच्या दरात वाढ झाल्याने केवळ ३०० रुपयेच हाती पडत आहेत. दिवसभर मरमर करून ३०० रुपये कमावण्यापेक्षा एवाद्या कंपनीत जाणे योग्य समजून अनेकांनी कामासाठी कंपनीची वाट धरली आहे.