मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Devendra Fadnavis | मराठवाड्यात दुष्काळाचे संकट; ५ ऑक्टोबरनंतर तातडीने पंचनामे: मुख्यमंत्री फडणवीस

एनडीआरएफच्या मदतीपूर्वीच राज्य सरकारकडून मदतीची तयारी

पुढारी वृत्तसेवा

Marathwada Drought October 5 Crop Survey

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदा पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, संकटाच्या काळात राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. १७) दिली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

नियमानुसार ५ ऑक्टोबरनंतर नुकसानीचे पंचनामे सुरू करता येतात. त्यानुसार पंचनाम्यांची तयारी आतापासूनच सुरू असून, ऑक्टोबरनंतर पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एनडीआरएफ) मदत मिळण्यापूर्वीच राज्य सरकारकडून मदत देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मराठवाडा सातत्याने विकासासाठी संघर्ष करीत आहे. त्याचबरोबर दुष्काळाचे संकटही या भागाला वारंवार भेडसावत आहे. यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसाने मोठा खंड घेतल्याने पिकांची स्थिती चिंताजनक झाली आहे.

पंचनाम्यांची तयारी सुरू

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने आतापासूनच पंचनाम्यांची तयारी सुरू केली आहे. ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एनडीआरएफकडून मिळणाऱ्या मदतीची प्रक्रिया सुरू असली तरी त्यापूर्वी राज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत पोहोचविण्याची तयारी केली जात आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

पावसाअभावी आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने त्यादृष्टीनेही नियोजन सुरू केले आहे. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत चारा लागवडीवर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सात वर्षांत ७० टीएमसी पाणी आणणार

मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध जलप्रकल्पांवर शासनाचे लक्ष असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कृष्णा-भीमा खोऱ्यातील अतिरिक्त ३० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्याच्या प्रकल्पाला जागतिक बँकेची मंजुरी मिळाली आहे. तसेच कोकणातील उल्हास खोऱ्यातील ७० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा प्रकल्प पुढील सात वर्षांत पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे.

४८ हजार कोटींची वीजबिले रद्द

शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना, मोफत वीज तसेच जुन्या ४८ हजार कोटी रुपयांच्या वीजबिलांची रद्दबातल करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरची पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात असून, लवकरच शहरातील प्रत्येक घराला दररोज पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्लस्टर, जालना ड्रायपोर्ट, सहापदरी ग्रीनफिल्ड रस्ता आणि घाटी रुग्णालयातील ७१० कोटी रुपयांच्या नवीन इमारतीसह विविध विकासकामांचाही त्यांनी आढावा घेतला.

कार्यक्रमास पालकमंत्री संजय शिरसाट, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, खासदार संदीपान भूमरे, खासदार कल्याण काळे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, प्रशांत बंब, सतीश चव्हाण, अंबादास दानवे, नारायण कुचे, अनुराधा चव्हाण आणि सुहास सिरसाठ आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT