छत्रपती संभाजीनगर : संघर्षाशिवाय कोणताही हक्क मिळत नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगत महाविहारासाठी सुप्रीम कोर्टापासून रस्त्यावरील लढ्यापर्यंत प्रत्येक स्तरावर संघर्ष करण्याची गरज अधोरेखित केली. भगवान बुद्धांचा धम्म हा सत्याचा धम्म आहे आणि सत्याचा विजय निश्चित आहे, असा विश्वास डॉ. भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केला.
भीम टेकडी येथे सुरू असलेल्या जागतिक धम्म परिषदेत डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून सामाजिक न्याय, धार्मिक स्वातंत्र्य, बौद्ध वारशाचे संरक्षण आणि संघटनात्मक एकतेबाबत सर्व मुद्द्द्यांवर सविस्तर भूमिका मांडत, महाविहाराचा प्रश्न उपस्थित केला. सम्राट अशोकांनी उभारलेल्या या ऐतिहासिक स्थळाबाबत जागतिक स्तरावर नोंदी असताना न्यायालयाकडून पुरावे मागितले जात असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला दुसरा न्याय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत बोधी पालो महाथेरो होते. त्यांनी शील जपा, तरच उद्धार होईल, असा संदेश देत भिक्खू संघाने एकमेकांवर टीका-टिप्पणी टाळावी, चुकीचा धम्म सांगू नये आणि संघाची एकता राखावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धम्मदर्शना महाथेरी यांनी केले. यावेळी भिक्खुनी धम्मदर्शना महाथेरी यांच्या मातोश्रींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.