डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ, उपाययोजनांचा अभाव  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Rising dengue cases : डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ, उपाययोजनांचा अभाव

दररोज नवे रुग्ण; लहान मुलांमध्ये वाढता प्रभाव, दखल घ्यावी

पुढारी वृत्तसेवा

तळणी ः तळणी जवळील देवठाणा गावात गेल्या दीड महिन्यापासून डेंग्यूने गंभीर स्वरूप धारण केले असून आरोग्य विभागाच्या अपुऱ्या उपाययोजनांमुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. गावात दररोज 4 ते 5 रुग्ण आढळत असूनही ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. मंगळवारी (दि5) रोजी नवीन दोन रूग्ण आढळून आले आहे.

तपासण्या केल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांना तातडीने खाजगी दवाखान्यांचा पर्याय निवडावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णामागे 20 ते 25 हजार रुपयांचा खर्च होत असून सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या दोन दिवसांत 8 ते 10 रुग्णांना जालना येथे उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती आहे.

देवठाणा हे तळणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येत असले तरी स्थानिक पातळीवर प्रभावी नियंत्रण दिसून येत नाही. जिल्हा व तालुका आरोग्य यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचेही स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, साधारणतः पावसाळ्यात आढळणारी डेंगूची साथ यंदा उन्हाळ्यातच वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लहान मुलांमध्ये वाढता प्रादुर्भाव ही आणखी एक चिंतेची बाब आहे. 8 ते 14 वयोगटातील मुलांमध्ये प्लेटलेट्स कमी होण्याचे प्रमाण वाढत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सुरुवातीला वयोवृद्धांमध्ये दिसणारी लक्षणे आता बालकांमध्ये आढळत असल्याचे समोर आले आहे.गावातील उपकेंद्रात डॉक्टरांची नियमित उपस्थिती नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. वारंवार मागणी करूनही तज्ञ डॉक्टरांचे पथक पाठवण्यात आलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे.

ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्याने स्थानिक प्रशासनावर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. गावातील पाणीपुरवठा टाकीची स्वच्छता अनेक दिवसांपासून न झाल्याने त्यात गाळ साचल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. त्यामुळेही साथ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

आरोग्य विभागाने उपाययोजना करा

डेंग्यूूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तपासण्या करून सरकारी दवाखान्यातच उपचार करणे गरजेचे असल्याचे पंढरीनाथ मोरे यांनी सांगितले.

ग्रामस्थांची मागणी

गावात तातडीने तज्ञ डॉक्टरांचे पथक पाठवावे, फॉगिंग व औषध फवारणी करावी, स्वच्छता मोहीम राबवावी आणि रुग्णांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT