Delay in crediting money to the accounts of those affected by heavy rains
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत करण्याचे सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार राज्य सरकारने आतापर्यंत मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकूण ३१७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ नऊशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पावसामुळे यंदा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. सुमारे ३२ लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली. पाच हजारांहून अधिक जनावरे दगावली. शंभराहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला. तसेच हजारो घरांची पडझड झाली. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी तीनवेळा मराठवाड्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली.
अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल असे सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारने ऑगस्टपासून २० ऑक्टोंबरपर्यंत सतरा अध्यादेशांद्वारे मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी एकूण ३१७५ कोटी रुपयांची मदत मंजूर केली. मात्र, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास उशीर लागत आहे. प्राप्त माहितीनुसार, मराठवाड्यात आतापर्यंत केवळ नऊशे कोटी रुपयांचेच शेतकऱ्यांना वाटप होऊ शकले आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्याची कार्यवाही सुरू असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात येत आहे.
ई-केवायसीमुळे अनुदान वाटपात अडचण अतिवृष्टीच्या मदत वाटपात ई केवायसी अडचण ठरत आहे. ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आहे आणि ज्यांनी यापूर्वी ई केवायसी केलेली आहे, त्यांनाच ई केवायसीच्या अटीतून सूट देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे. मात्र असंख्य बाधित शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी असल्याने अनुदान वाटपात अडचण येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.