Chhatrapati Sambhajinagar Close Padegaon garbage depot
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पडेगाव कचरा डेपोमध्ये मोठ्याप्रमाणात कचरा साचलेला आहे. त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होत असली तरी शिल्लक कचऱ्यावर लैंडफिलची आवश्यकता आहे. त्यासाठी महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितल्याने शुक्रवारी (दि.१३) मौलाना आझाद संशोधन केंद्रात सुनावणी घेण्यात आली.
मात्र, यात कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे मेटाकुटीला आलेल्या १५ वसाहतींतील दीडशेहून अधिक नागरिकांनी परवानगीला कडाडून विरोध करीत कचरा डेपो हटविण्याची एकमुखी मागणी केली.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी मनीष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी अच्युत नांदवटे, अर्जदार मनपाच्या घनकचरा विभागाचे नंदकिशोर भोंबे यांची उपस्थिती होती. शुक्रवारी दुपारी १२ वाजता या सुनावणीला सुरुवात झाली. पडेगाव कचरा डेपोमध्ये दररोज सुमारे ४० हून अधिक वाँडाँचा कचरा संकलित करून आणला जातो. सध्या या डेपोमध्ये ७५ हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे.
या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येत आहे. यानंतरही शिल्लक राहणाऱ्या काही कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही. त्यासाठी महापालिका या शिल्लक कचऱ्यावर लैंडफिल करण्याच्या तयारीत असून हाच त्यासाठी एकमेव पर्याय असल्याचे मनपाचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रक्रियेसाठी महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेणे आवश्यक असते. त्यासाठी शुक्रवारी मौलाना आझाद संशोधन केंद्रामध्ये सुनावणी घेण्यात आली.
यात पडेगाव, भावसिंगपुरा, लालमाती, श्रावस्ती कॉलनी, पेठेनगर, राजधानीनगर, साकेतनगर, भीमनगर, कासंबरी दर्गा या परिसरातील १५० हून अधिक नागरिक उपस्थित होते. एवढेच नव्हे या डेपोमुळे सर्वाधिक प्रमाणात त्रस्त असलेले ग्लोरिया सिटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी अगोदर कचरा डेपोला कडाडून विरोध केला. माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांनीही वस्तुस्थिती मांडली. तसेच विस्तारीकरणाला त्यांनी विरोध केला, तर अनेकांनी तक्रारी सादर केल्या.
या सुनावणीसाठी कचरा डेपोलगतच्या वसाहतीतील नागरिकांना बोलवणे आवश्यक असते. परंतु, महापालिका प्रशासनाने चलाखी करीत थेट आपल्या सफाई कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुनावणी स्थळी बोलावून घेतले. या प्रकारामुळे माजी नगरसेवक कृष्णा बनकर हे संतापले. ही सुनावणी संबंधित परिसरातील रहिवाशांसाठी आहे. येथे मनपाचे कर्मचारी कशासाठी आणले, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे मनपाचे अधिकारीही चपापले.
कचरा डेपोमुळे या भागातील जमिनींचे दर घसरले, नागरिक राहायला येत नाहीत. ग्लारिया सिटीत २०० फ्लॅट असताना १०० रिकामे आहेत. पंचक्रोशीतील नागरिकांना कचऱ्याला आग लागल्यावर धुराचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आम्हाला श्वासनाचा त्रास सुरू झाला. आरोग्य धोक्यात आले. डेपोमुळे विहिरी आणि बोरचे पाणी देखील दूषित झाले. यामुळे मरण यातना सहन कराव्या लागत आहेत.
कचरा डेपोमधील जो कचरा प्रक्रियेनंतरही शिल्लक राहतो. तो सायंटीफिक लैंडफिलिंगद्वारे नष्ट केला जातो. हा कचरा खड्डा तयार करून त्यात शेततळ्यासाठी लागणारे पॉलिथीन अंथरले जाते. त्यासोबतच कचर्यातून निर्माण होणारे पाणी म्हणजेच लिचड वाहून जाण्यासाठी पाईप टाकले जाते. त्यावर कचरा टाकला जातो. पुन्हा त्यावर माती टाकून पॉलिथीन टाकून त्यावर कचरा टाकला जातो व माती टाकली जाते, असे थर तयार करणे म्हणजेच सायंटीफिक लैंडफिल असते, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.