Bombay High Court chhatrapati sambhajinagar Bench on Children from second marriage Right on father's property
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुसऱ्या लग्नापासून झालेल्या अपत्यास वडिलांच्या मालमत्तेमध्ये वाटणीचा अधिकार असल्याबाबतचा महत्त्वाचा न्यायनिवाडा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. पी. ब्रह्मे यांनी दिला.
वर्षा (नाव बदलेले) ने तिच्या सावत्र आईविरोधात उदगीर दिवाणी न्यायालयात वाटणीचा दावा दाखल केला. सदर दाव्यात मृत वडिलांच्या मिळकतीत हिस्सा मागितला होता. उदगीर न्यायालयाने सदर दावा मंजूर करत मुलीला हिस्सा दिला. जिल्हा न्यायालयाने यावरील अपील खारीज केले. सदर नाराजीने, सावत्र आईने उच्च न्यायलयात दुसरे अपील दाखल केले.
सावत्र आईने, वर्षा ही दुसऱ्या लग्नातील अपत्य असल्यामुळे तिला वाटणीचा दावा दाखल करता येणार नाही, हिस्सा मिळणार नाही, या आशयाचा युक्तिवाद उच्च न्यायालयात मांडला.
सुनावणीअंती खंडपीठाने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रेवनसिदपा विरुद्ध मल्लिकार्जुन या निवड्याचा दाखला दिला. अवैध लग्नापासून झालेल्या अपत्यास सर्वोच्च न्यायालयाने तसेच हिंदू विवाह कायदा, १९५५ कलम १६ (१) अन्वये अवैध लग्नापासून झालेल्या अपत्यास वैधानिक वैधता कायद्याने गृहीतकाद्वारे दिलेली आहे. प्रतिवादी मुलीस दिलासा देत तालुका कोर्टाचा निकाल कायम करत दुसरे अपील खारीज केले आहे. सदर प्रकरणी प्रतिवादी मुलीतर्फे अॅड. अजिंक्य रेड्डी यांनी काम पाहिले त्यांना अॅड. विष्णू कंदे यांनी सहकार्य केले.