छत्रपती संभाजीनगर : शहराच्या दीर्घकालीन विकासाचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेंद्रा-बिडकीन आरिकमध्ये दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक दिली आहे. त्यासोबतच आता दणळवळणाचे जाळेही सुसज्ज करण्यात येत असून, यात शेंद्रा ते वाळूज एमआयडीसी या अखंड उड्डाणपुलासोबतच नवीन पाणीपुरवठा योजनेच्या व्हॉल्व्हमुळे अडचणीत आलेल्या छत्रपती संभाजीनगर-पैठण या जुन्या रस्त्यालगतच आता नवा रस्ता तयार केला जाणार आहे, असे संकेत पारंपरिक ऊर्जा व ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी (दि. २४) दिले.
मागील अडीच वर्षांपासून बिडकीन आणि शेंद्रा आरिकमध्ये दीड लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. यासोबतच आता जिल्ह्यातील दळणवळणाचा विचार करून राज्य शासन प्रमुख रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीवर भर दिला आहे. त्यातील महत्त्वाचे म्हणजे आहिल्यानगर ते ढोरेगाव-बिडकीनमार्गे करमाड, शेंद्रा डीएमआयसी इंडस्ट्रीयल ग्रीनफिल्ड रस्त्याचे कामा आता मार्गी लागणार आहे. त्यासाठी लवकरच भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू होणार आहे.
या रस्त्यासोबतच आता पैठण छत्रपती संभाजीनगर या रस्त्याचेही नियोजन करण्यात येत आहे, असे सांगत मंत्री सावे म्हणाले शहरासाठी नव्याने टाकण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे व्हॉल्व्ह सुमारे १५ ते २० किलोमीटरमध्ये ठिकठिकाणी पैठण-संभाजीनगर मुख्य रस्त्या मध्यभागापर्यंत आले आहेत. त्यामुळे अपघात होऊन जलवाहिनीला अडचण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
हा विचार करून सध्या अस्तित्वात असलेल्या छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्त्याला समांतर रस्ता तयार करण्याचे नियोजन शासनास्तरावर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना त्याबाबत मागणीही केली आहे. त्यामुळे आता या रस्त्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे, असे संकेतही मंत्री सावे यांनी दिले.
अखंड उड्डाणपुलाचा आराखडा अंतिम टप्प्यात
शेंद्रा ते वाळूज अखंड उड्डाणपुलावर चढण्या-उतरण्यासाठी कुठे-कुठे कनेक्टिव्हिटी द्यायची, यासाठी सध्या वाहन संख्यांचा लोड चेक करण्यात येत आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच आराखडा तयार होणार आहे. त्यानंतर पुलाच्या कामासाठी प्रक्रिया सुरू होईल, असे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
त्या रस्त्यांचे रुंदीकरण लवकरच
शहरातील प्रमुख सात रस्त्यांवर विकास आराखड्यानुसार बेकायदा बांधकामे पाडली आहेत. या पाडापाडी झालेल्या जागेत लवकरच रस्त्याचे काम होणार असून, त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
अहिल्यानगर रोड ६ पदरी
शहरातून नगर नाका ते अहिल्यानगरपर्यंत जाणारा रस्ता लवकरच सहा पदरी होणार आहे. त्यासाठी आता नियोजन सुरू असून, यामुळे औद्योगिक विकासाचा चालणार मिळणार आहे.