पैठण; चंद्रकांत अंबिलवादे : पैठण येथील नाथसागर धरण परिसरात केंद्र व राज्य शासनाच्या वतीने प्रस्तावित सौरउर्जा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात येऊन केंद्रशासनाच्या अधीन असलेल्या एनटीपीसी (NTPC) कंपनीला दिलेले काम तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यासाठी आज (दि.७) हजारो मच्छीमार बांधव आपल्या कुटुंबासह पैठण शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणास बसले. यावेळी या प्रकल्पासाठी पुढाकार घेणारे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा निषेध करून उपोषणाला प्रारंभ केला.
नाथसागर धरण आणि परीक्षेत्र हे पक्षी अभयारण्य म्हणून १९८६ ला घोषित झालेले आहे. नाथसागर परिसरात इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे नाथसागर पक्षी अभयारण्याभोवती पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना पर्यावरण व वन मंत्रालयाने जारी केली आहे. अभयारण्याची सीमारेषा ५०० मीटरपर्यंत असून ते एकूण १४१ किलोमीटर क्षेत्रापर्यंत विस्तारलेले आहे. आता या झोन क्षेत्रात बांधकाम, मशीन्स, बांधकाम आणि विविध कृतींना बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सौरऊर्जा प्रकल्पाने काही वाईट परिणाम होतील. सौर पॅनलमुळे सूर्याची किरणे पाण्याखाली जाणार नसून पाण्यातील जीव आणि पक्ष्यांची अंडी घालण्याचे ठिकाण यामुळे संपुष्ठात येईल. अन्न नसल्याने स्थलांतरित पक्षी येणार नाहीत शिवाय येथील पक्ष्यांच्या अधिवासाची जागा घटून धरण परिसरातील जैवविविधता संपुष्ट येईल.
नाथसागर जलाशयात शेवगाव, नेवासा व स्थानिकसह जालना जिल्ह्यातील अंबड, पाथरवाला, शहागड, गोंदी, राक्षसभवन येथील मच्छीमार कुटुंब उदरनिर्वाह करतात. या प्रकल्पामुळे २० हजार कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. वनविभाग, पाटबंधारे विभाग, जलसिंचन विभागाने धरण क्षेत्रातील या प्रस्तावास परवानगी देऊ नये व सौरउर्जा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे. कहार, कोळी, भिल्ल, भोई समाजातील मच्छीमार बांधवासह कुटुंबातील लहान मोठ्या मुला मुलींनी देखील या आमरण उपोषणामध्ये सहभाग नोंदविला.
हेही वाचा :