छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरला देशातील आघाडीचे औद्योगिक, तंत्रज्ञान आणि शिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी उद्योग, पायाभूत सुविधा आणि शहरी विकासाला चालना देणाऱ्या विविध मागण्या देशाचे पंतप्रधान यांचे आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांच्यासमोर मांडण्यात आल्या. यात मेट्रो, ग्रोथ सिटी, डिफेन्स कॉरिडॉर वासह शहराच्या शैक्षणिक व औद्योगिक विकासासाठी 'आयआयटी'ची स्थापना करण्याची मागणी उद्योजकांनी केली.
सीएमआयए आणि सीएसएन फर्स्ट संस्थेच्या तर्फे आयोजित विशेष सत्रासाठी संजीव सन्याल हे गुरुवारी शहराच्या दौ-यावर आले होते. यावेळी त्यांच्यासमोर शहराच्या २०४७ विकासदृष्टीला गती देण्यासाठी प्रशासन, उद्योग आणि नागरिक यांच्यात समन्वयातून ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रितेश मिश्रा यांनी सीएसएन फर्स्टच्या माध्यमातून 'क्लीन अँड ग्रीन सिटी', शहर पायाभूत सुविधा, युवक व क्रीडा, शिक्षण आणि पर्यटन व शहर ब्रडिंग या पाच प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका मांडण्यात आली.
या माध्यमातून शहराला गुंतवणूक, रोजगार आणि पर्यटनासाठी अधिक सक्षम बनविण्याचा प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला. तसेच सुमारे ३० हजार व्यावसायिक विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेत असलेले शहर, ऑटोमोबाईल आणि फार्मास्युटिकल उद्योगांचे अस्तित्व, स्टार्टअप्स, संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप इनक्युबेशन तसेच इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर यामुळे संभाजीनगरमध्ये उच्च दर्जाचे कौशल्य आणि उद्योग यांची सांगड घालण्याची मोठी क्षमता असल्याचे मांडण्यात आले. यावेळी राज्याचे मंत्री अतुल सावे, महापौर समीर राजूरकर यांच्यासह सीएमआयएचे अध्यक्ष अथर्वेशराज नंदावत, मानद सचिव अजिंक्य सावे, उपाध्यक्ष मिहीर सौन्दलगेकर, सोहम कोटक यांच्यासह अनेक उद्योजकांची उपस्थिती होती.
हाय-स्पीड कॉरिडॉर
सीएमआयएने उद्योगांच्या वाढीसाठी व्यवसाय अनुपालन प्रक्रिया सुलम करणे, सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन (पीएलआय) योजनांचा विस्तार, औद्योगिक परवान्यांच्या प्रक्रियेला गती देणे, संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरचा विस्तार, विद्यापीठ औद्योगिक टाउनशिपची निर्मिती, जीसीसी आणि डेटा सेंटरसाठी उच्च-गती डेटा कनेक्टिव्हिटी आणि बाजारपेठा, बंदरे, विमानतळ तसेच देशातील प्रमुख भागांशी जलद जोडणी देणारा हाय-स्पीड कॉरिडॉर या प्रमुख मागण्या मांडल्या.
ईव्ही राजधानी
छत्रपती संभाजीनगरला २०४७ पर्यंत देशातील आघाडीच्या पाच औद्योगिक केंद्रांमध्ये स्थान मिळवून देणे, भारताची ईव्ही राजधानी म्हणून विकसित करणे, अजिंठा-वेरूळच्या वारशाच्या माध्यमातून प्रमुख पर्यटन केंद्र बनवणे आणि तंत्रज्ञान व शिक्षणाचे हब म्हणून विकसित करणे, अशी व्यापक विकासदृष्टी यावेळी मांडण्यात आली.