छत्रपती संभाजीनगर : शहरात रात्री उशिरापर्यंत काही हॉटेल्स आणि बार राजरोसपणे सुरू ठेवून गुन्हेगारीला खतपाणी घातले जात असल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. सिडको एन-७ येथील 'सुरभी' हॉटेल येथे सोमवारी (दि.२९) पहाटे ४ वाजेच्या सुमारास वाढदिवसाची पार्टी साजरी करून बाहेर पडलेल्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात बिअरची बाटली आणि दगडाने जीवघेणी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या महिन्यातच कारमधून ऐवज चोरी
सुरभी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या मेडिकल चालकाच्या कारची काच फोडून गेल्या महिन्यातच मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास आयपॅडसह ८० हजार चोरट्याने लंपास केले होते. या घटनेनंतरही सिडको पोलिसांना जाग आलेली नाही. पहाटे ४ वाजेपर्यंत हे हॉटेल उघडे राहतेच कसे? रात्रगस्तीवरील पोलिस करतात तरी काय? नियमांची पायमल्ली करणारे बार चालक आणि नशापाणी करून गुन्हे करणाऱ्या टोळक्यांची हिम्मत स्थानिक पोलिसांच्या 'अर्थपूर्ण' दुर्लक्षामुळे वाढल्याचे दिसून येत आहे.
शहराची शांतता धोक्यात!
शहरात नियमांची पायमल्ली करत वेळेनंतरही अनेक वाईन शॉप आणि बार राजरोसपणे सुरू राहतात. अनेक वाईन शॉपसमोर चक्क 'ओपन बार' सुरू असतात, ज्यामुळे सामान्य नागरिकांना दारुड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग केवळ कागदी कारवाया दाखविण्यातच मश्गुल आहे. काही ठराविक हॉटेल्स, बार आणि ढाब्यांकडे काणाडोळा केला जातो. अधिकाऱ्यांच्या या 'अर्थपूर्ण' मेहेरबानीमुळेच शहराची शांतता धोक्यात येत आहे.
डोक्यात दगड घातला, दात पाडले
पहिला गट
पहाटे ४ वाजता हॉटेलबाहेर फिर्यादी मयूर अनिल जैस्वाल (२७, रा. यशश्री हौ. सो., सिडको) याच्या तक्रारीनुसार, पहाटे ३ वाजता सुरभी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. आल्यानंतर आरोपी राहुल वाघमारे, रवी साळुंके आणि अक्षय शिरसाठ यांनी धक्का देऊन शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर शुभम भागवत याने मयूरच्या तोंडावर बिअरची बाटली फोडून त्यांचे पुढचे दोन दात पाडले. आरोपींनी मयूरला उचलून जवळच असलेल्या एचपी गॅसच्या अंडरग्राउंडमध्ये फेकून दिले आणि त्यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. तसेच मयूरच्या दुचाकीची तोडफोड केली. याप्रकरणी राहुल सुधीर वाघमारे, रवी बाळासाहेब साळुंके, अक्षय भगवान शिरसाठ आणि शुभम बाळासाहेब भागवत यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दगडाने मारहाण, मोबाईलही फोडला
दुसऱ्या गटातील रवींद्र नानासाहेब साळुंके (२९, रा. संजयनगर, बायजीपुरा) यानेही तक्रार दिली.
दुसरा गट
शिरसाठ याच्या वाढदिवसाच्या त्यानुसार, तो मित्र अक्षय पार्टीसाठी सुरभी हॉटेलमध्ये गेला होता. पहाटे ४ वाजता हॉटेलमधून बाहेर आल्यावर मयूर जैस्वाल आणि अक्षय यांच्यात दुचाकी काढताना वाद झाला. रवींद्र आणि त्याचे मित्र मध्यस्थीसाठी गेले असता, मयूर आणि त्याचे मित्र अभिजीत जैस्वाल, निखिल फुलारी आणि धम्मा कदम यांनी त्यांना मारहाण केली. निखिलने रवींद्रच्या गालावर दगड मारून जखमी केले, तर धम्माने रवींद्रचा मोबाईल रस्त्यावर आपटून फोडला. याप्रकरणी अभिजीत जैस्वाल, निखिल फुलारी आणि धम्मा कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.